मुंबई : विभक्त पत्नीच्या ताब्यात असलेल्या पाच वर्षांच्या मुलीला बळजबरीने घेऊन जाण्याची पित्याची कृती अविवेकी असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने बुधवारी ओढले. तसेच, या जोपड्याने आपल्या वैवाहिक कलहापासून मुलीला दूर ठेवावे,असेही न्यायालयाने याचिकाकर्ती पत्नी आणि प्रतिवादी पतीला बजावले.विभक्त पती आमच्या पाच वर्षांच्या मुलीला बळजबरीने घेऊन गेला आणि त्याने तिला पुन्हा आपल्या ताब्यात देण्यास नकार दिला,असा दावा करून याचिकाकर्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच, मुलीला न्यायालयात उपस्थित करण्याचे आदेश पतीला देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने तिच्या याचिकेची दखल घेऊन प्रतिवादी पतीला मुलीसह न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे बुधवारी प्रकरण सुनावणीसाठी आले. प्रतिवादी पती पाच वर्षांच्या मुलीसह यावेळी न्यायालयात उपस्थित होता. त्यावेळी, विभक्त झाल्यानंतर आमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा आपल्याला मिळाला. तथापि, प्रतिवादी मुलीला बळजबरीने घेऊन गेला आणि त्याने तिला परत आपल्या ताब्यात देण्यास नकार दिला, असे याचिकाकर्तीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तर, आपण मुलीला बळबजरीने आपल्यासोबत नेलेले नाही, असा प्रतिदावा प्रतिवादी पतीने न्यायालयात केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, याचिकाकर्तीच्या ताब्यात असलेल्या मुलीला बळजबरीने आपल्यासोबत नेण्याच्या प्रतिवादीच्या कृतीबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, त्याची ही कृती अविवेकी असल्याचे ताशेरेही ओढले. प्रतिवादीच्या या कृतीचा मुलीला किती मोठ्या प्रमाणात धक्का बसला असेल याची कल्पना करा, असेही न्यायालयाने सुनावले. रात्री, वडिलांनी मुलीला तिच्या मावशी किंवा आईकडून हिसकावून घेतले आणि तिला घेऊन निघून गेला. आता तो आपण तिला बळजबरीने घेऊन गेलोच नसल्याचा दावा करत आहे, असेही न्यायालयाने फटकारले. तसेच, प्रतिवादीने लागलीच मुलीचा ताबा याचिकाकर्तीकडे सोपवण्याचे आदेश दिले. त्याचवेळी, न्यायालयाने प्रतिवादी पतीला दिलासा देताना दर शनिवारी मुलीला भेटण्याची परवानगीही दिली. त्याचप्रमाणे याचिकाकर्ती आणि प्रतिवादीने त्यांच्यामधील भांडणापासून मुलीला दूर ठेवण्याचे पुन्हा बजावले.