मुंबई – भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपरने धडक दिल्याने २८ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी मालाड येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूलावर हा अपघात घडला. अपघातानंतर डंपरचालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला आहे.
अजय गुप्ता (२८) हा दुचाकीस्वार शुक्रवारी दुपारी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जोगेश्वरीच्या दिशेने जात होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास दक्षिण वाहिनीवरील टाईम्स ऑफ इंडिया इमारती समोरील उड्डाणपुलावर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एमएच ४७ बीवाय ६६६९) त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत गुप्ता गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघात घडताच चालक डंपर घटनास्थळावर सोडून पळून गेला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी डंपर चालकाविरोधात मोटार वाहतूक अधिनियमाच्या कलम १३४ (अ) १३४ (ब), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण तसेच डंपरच्या क्रमांकावरून चालकाची ओळख पटवून त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती कुरार पोलिसांनी दिली
मयत आकाश गुप्ता हा सेल्मसन म्हणून काम करत होता. तो जोगेश्वरी येथे आपल्या मामाकडे रहात होता. मिरा रोड येथून दुचाकीवरून कांदा बटाटे आणून तो जोगेश्वरी परिसरातील दुकानदारांना पुरवत होता.