मुंबई : महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार पावसाळापूर्व कामे वेगाने सुरु असतानाच, तसेच दरवर्षीच्या तुलनेत पंधरवड्यापूर्वीच मोसमी पावसाचे मुंबईत आगमन झाल्यामुळे नाले स्वच्छता, रस्ते व इतर कामांवर त्याचा परिणाम झाला, असे मत महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी व्यक्त केले. नागरी सेवा-सुविधांची सर्वोच्च प्राथमिकता लक्षात घेता पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरुप योग्य सुधारणा कराव्यात, उपाययोजनांना जास्तीत-जास्त वेग द्यावा. सजग राहून वेगाने कामे पूर्ण करावीत व यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे आदेश त्यांनी दिले.
मुसळधार पावसामुळे मुंबईत दोन दिवसांपूर्वी उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी पालिकेच्या पावसाळी कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी यंत्रणांना विविध सूचना दिल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा दिवस आधीच मोसमी पावसाचे आगमन झाल्यामुळे नाल्यांमधून गाळ उपसण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. असे असले तरी पावसाळी कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये, यासाठी आधीच्या नियोजनामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात, असे आदेश गगराणी यांनी दिले. नदी – नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करावीत, असेही त्यांनी नमूद केले. सखल व अतिसखल भाग, मुसळधार पावसावेळी पाणी साचू शकेल, अशा सर्व संभाव्य ठिकाणी मिळून ४१४ उदंचन संच लावण्याचे नियोजन यंदा केले आहे. त्यानुसार, सर्व ठिकाणी उदंचन संच (पंप सेट) बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे, याची खातरजमा करावी. उदंचन यंत्रणा स्थापन करुन ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही पुढील २४ तासात पूर्ण करावी. ही यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत आहे, हे तपासण्यासाठी त्याची योग्य ती चाचणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
हाजीअली, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया आदी उदंचन केंद्रांतील पूरनियंत्रण दरवाजे वेळेत व योग्यरीत्या लावण्यात यावेत. दर दोन तासांनी त्यांची उघडझाप करून ते सुस्थितीत कार्यान्वित आहेत, याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला पुरविण्यात यावी. रस्ते काँक्रिटीकरणातील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत. अपूर्ण राहिलेले रस्ते मास्टिकने पूर्ण करुन वाहतूकयोग्य करावेत. तसेच २४ तासांच्या आत रस्त्यावरील राडारोडा, रस्तारोधक (बॅरिकेड्स) आणि इतर साहित्य काढून ते गोदामांमध्ये न्यावे. कोणत्याही स्थितीत रस्त्यांवर वाहनांना अडथळा राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे, वृक्षछाटणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, आदी सूचना गगराणी यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त उपस्थित होते.