मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगर स्वच्छ राखण्यासोबतच मुंबईकर नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान अधिक सुदृढ ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आता मुंबईतील स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेची ‘गुलाबी सेना’ सरसावली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या ‘गुलाबी सेने’त सुमारे ९ हजार ६०० हून अधिक महिला स्वच्छता कर्मचारी कार्यरत असून दुसरे झाडलोट सत्राअंतर्गत (सेकंड स्वीपिंग) मुंबईत विशेष स्वच्छता करण्यात येत आहे. या अंतर्गत ५ ते २८ मे २०२५ दरम्यानच्या २३ दिवसांमध्ये १५० टन राडारोडा, १८० टन टाकाऊ साहित्य आणि ३६० टनांपेक्षा अधिक कचरा निष्कासित करण्यात आला आहे.
मुंबई महानगरात स्वच्छता अबाधित रहावी या उद्देशाने मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर रस्त्यांवर दुसरे झाडलोट सत्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषत: रेल्वे स्थानक, मुख्य मार्ग, वर्दळीची ठिकाणी, मोठ्या बांधकाम प्रकल्पांलगतच्या परिसरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे.
दरम्यान, पालिकेच्या गुलाबी सेनेत ७० टक्क्यांहून अधिक म्हणजे एकूण १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांपैकी ९ हजार ६०० महिला स्वच्छता कर्मचारी आहेत. या गुलाबी सेनेत ५ ते २८ मे या कालावधीत १५० टन राडारोडा, १८० टन टाकाऊ साहित्य आणि ३६० टनांपेक्षा अधिक कचरा संकलित करुन त्याची योग्य विल्हेवाट लावली आहे. या मोहिमेमुळे मुंबईतील रस्ते स्वच्छ होत असून वायू प्रदूषण कमी होण्यास आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे, असा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.