मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील पी टंडन मार्गावरील एका इमारतीचे पाडकाम सुरू असून या कामादरम्यान प्रदूषण नियंत्रणासाठीचे कोणतेही नियम पाळलेले नाहीत. त्यामुळे या परिसरात प्रचंड धूळ पसरत आहे. बेदरकारपणे इमारतीचे पाडकाम करणाऱ्या संबंधित विकासकाला मुंबई महापालिकेच्या के पश्चिम विभागाने नोटीस पाठवली आहे. तत्काळ पाडकाम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंधेरी पश्चिमेकडील पी टंडन मार्गावरील संगम या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यासाठी इमारतीचे पाडकाम सध्या सुरू आहे. तेथील कामाची पालिकेच्या विभाग कार्यालयातील पथकाने पाहणी केली असता वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले. मुंबईच्या वातावरणातील हवेचा स्तर बिघडू लागल्यामुळे पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी कृती आराखडा जाहीर केला होता. तसेच यावर्षीही २८ मुद्द्यांची नियमावली जाहीर केली. त्यात बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी कोणते नियम पाळावेत याबाबत सांगितले आहे. बांधकाम प्रकल्प हा चोहोबाजूनी उंच पत्र्याने तसेच हिरव्या कापडाने झाकलेला असावा, राडारोडा झाकलेला असावा, धूळ उडू नये म्हणून सातत्याने पाणी फवारणी करावी असे नियम घालण्यात आले आहेत. मात्र १ जानेवारी रोजी पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत यापैकी कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या के पश्चिम विभागाने संबंधित व्यावसायिकाला मुंबई महापालिका अधिनियमाच्या ३५४ कलमांतर्गत नोटीस पाठवली आहे.

हेही वाचा…महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय

या इमारतीच्या पाडकामातून किती प्रमाणात धूळ बाहेर पडते याबाबतची ध्वनिचित्रफित अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेने समाज माध्यमांवर टाकली होती. त्यावरून पालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. इमारतीच्या पाडकामामुळे परिसरात प्रचंड धूळ पसरली असून, प्रचंड आवाज व कंप येथील रहिवाशांना जाणवत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा…बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेने विकासकाला पाठवलेल्या नोटीशीत इमारतीचे पाडकाम ताबडतोब थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाडकाम ताबडतोब न थांबवल्यास पुढे कोणतीही नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या घटनास्थळावर पुनर्विकास प्रकल्पासाठी असलेले मनुष्यबळ ताबडतोब हटवण्याची विनंती पोलिस ठाण्याला करण्यात आल्याचेही या नोटीशीत म्हटले आहे.