मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्यामुळे सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये प्रभागांची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाने सर्व पालिकांना दिल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनही कामाला लागले आहे. मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी जशी प्रभाग रचना होती, त्यानुसारच प्रभागांच्या सीमा ठेवण्यात येणार आहेत. मात्र गेल्या आठ वर्षांत प्रभागांच्या सीमांमध्ये काही बदल झाले आहेत का, याची चाचपणी करून हा प्रारुप आराखडा तयार केला जाणार आहे. राज्य सरकारच्या आदेशात आराखडा सादर करण्यासाठी कालमर्यादा दिलेली नसल्यामुळे प्रशासनात संभ्रमाचे वातावरण असले तरी या सगळ्या कामासाठी सुमारे एक – दीड महिना लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कामात घाई नको आणि कामाला उशीरही नको
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याकरीता नगर विकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये ८ सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहित धरण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागांची संख्या गृहित धरण्यात आली आहे. आता मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रभागांची संख्या २३६ करण्यात आली होती. त्यानुसार प्रभागांच्या सीमा ठरवण्यात आल्या होत्या. मात्र आताच्या आदेशानुसार २२७ प्रभाग कायम करण्यात आल्यामुळे २०१७ मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती. तेव्हाची प्रभाग रचना ग्राह्य धरून त्यात काही लहान – मोठे बदल झाले आहेत का किंवा त्यात काही त्रुटी होत्या का, हे तपासले जाणार आहे. त्याकरीता मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. येत्या काळात पालिका प्रशासनात मोठ्या प्रमाणावर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी कालमर्यादा दिलेली नसली तरी कामात घाई नको आणि कामाला उशीरही नको असे धोरण पालिका प्रशासनाने स्वीकारले आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने प्रभागांच्या सीमारेषांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे ठरवले आहे. त्याकरीता सध्या करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रभागात जाऊन सीमारेषांची पाहणी करण्यास सांगितले जाणार आहे. त्यात एखाद्या सीमारेषेजवळ एखादी नवीनच मोठी इमारत उभी राहिली असेल तर किंवा एखादा नवीनच रस्ता तयार झाला असेल तर सीमारेषेतील बदलाबाबत निर्णय घेतला जाईल. अशा परिस्थितीत तिथे ठोस कारण दिले जाईल. मात्र असे बदल क्वचितच असण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. २२७ प्रभागांच्या या स्थळपाहणीसाठी काही पथके तयार केली जातील. या स्थळ पाहणीनंतर प्रत्यक्ष कागदोपत्री माहिती भरणे आणि आयोगाच्या नियमानुसार ती तीनदा तपासून बघणे ही सगळी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर हा प्रारुप आराखडा राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला किमान एक दीड महिना लागू शकतो, अशी शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारकडे प्रारुप आराखडा दिल्यानंतर तो आराखडा आयोगाकडे जाईल व त्यानंतर आराखडा प्रसिद्ध केला जाईल. त्यावर त्यावर सूचना व हरकती घेऊन सुनावणी पार पडली की आराखडा अंतिम होईपर्यंत दोन अडीच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्यांचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात आरक्षण पडण्याची शक्यता आहे.
मनुष्यबळाचा प्रश्न
या निवडणुकीसाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. सध्या प्रभाग रचनेच्या कामासाठी मनुष्यबळ मोजकेच लागणार आहे. मात्र त्यानंतर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पदाच्या कामासाठी ७००० कर्मचारी, तर मतदानाच्या दिवसासाठी ६० हजार कर्मचारी लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, अन्य शासकीय प्राधिकरणातील कर्मचारी मिळून हा कर्मचारी वर्ग घेतला जातो. मात्र आता पावसाळ्याचे दिवस असून मुंबई महापालिकेच्या आरोग्य, रस्ते, घनकचरा, पर्जन्यजलवाहिन्या या विभागांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे पालिकेला मनुष्यबळाचे नियोजन करावे लागणार आहे. तसेच पालिकेच्या निवडणूक विभागातील अनुभवी कर्मचारी वर्ग गेल्या आठ वर्षात निवृत्त झाला असल्यामुळेही नवीन कर्मचाऱ्याकडून हे काम करून घ्यावे लागणार आहे.
१ कोटी २४ लाख लोकसंख्या
या निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी लोकसंख्या आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागातील सरासरी लोकसंख्या ५४ हजार इतकी आहे.
मतदारयाद्या …
या निवडणुकीसाठी सध्याच्या घडीला नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीची मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघ असून एका विधानसभा मतदारसंघात मुंबई महापालिकेचे साधारण सहा प्रभाग येतात. त्यामुळे मतदारयाद्या या प्रभागांनुसार फोडाव्या लागणार आहेत. त्याकरीता येत्या काळात मोठ्या प्रमाणावर मनुषयबळ लागणार आहे.