मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांवर पसरणाऱ्या घाणीपासून नागरिकांना दिलासा मिळावा तसेच या कालावधीत रस्ते स्वच्छ राहावेत, यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जूनदरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोहिमेत दररोज सकाळी १० वाजण्यापूर्वी स्वच्छता तसेच गरजेनुसार दोन वेळा झाडलोट (सेकंड स्विपिंग) करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरातील विविध भागांत स्वच्छता अबाधित राहावी, या उद्देशाने महापालिकेने विशेष पुढाकार घेतला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने पावसाळ्यात नियमित अंतराने कचरा संकलन करून परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या टाकाऊ वस्तूंमुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणांवर टाकलेल्या वस्तू, साहित्य गोळा करण्यावर भर देण्यात येणार आहे. टाकाऊ वस्तुंप्रमाणेच रस्ते व पदपथांच्या कडेला पडून असणारे दगड (कर्बस्टोन), पेव्हर ब्लॉक, प्रकल्प स्थळांवरील राडारोडा, इतर राहिलेले साहित्य गोळा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नदी, नाल्यांच्या परिसरातील स्वच्छतेवरही मोहिमेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्यानुसार २९ मे ते १५ जूनदरम्यान महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कचरा जमा होणारी ठिकाणे शोधून त्याठिकाणी सखोल स्वच्छता केली जाईल. त्यात रस्ते, गल्ली–बोळ यांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कर्बस्टोन, नाले व जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पादचारी मार्ग, रस्त्यावरील कचरा, टाकाऊ सामग्री, राडारोडा, बेवारस साहित्य हटवण्यासाठी आवश्यकतेनुसार यंत्रसामग्रीचा वापर करून कचऱ्याचे संकलन करण्यात येईल. नाल्यांलगतच्या भूखंडांवरून आणि प्रकल्पांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला राडारोडा तसेच कचरा उचलून स्वच्छता करण्यात येईल. मालकी हक्क काहीही असला तरी सर्व भूखंडांवरून (राडारोडा वगळून) कचरा संकलित करण्यात येईल. दरम्यान, घरे गृहनिर्माण संस्था तसेच अन्य आस्थापनांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडारोडा टाकू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.