मुंबईः मालावणी येथे दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून २५ वर्षीय तरुणाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सचिन दशरथ जैस्वाल (२५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बोरिवली पश्चिम येथील भीम नगरमधील रहिवासी आहे. त्याचा मित्र आकाश गायकवाड (३२) याच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार बुधवारी ते आणि त्यांचे मित्र भीम नगर येथे जमले होते. त्यावेळी गायकवाड व सचिन दोघेही गांजा आणण्यासाठी मालवणी येथील इमान हुसैन चौक येथे गेले. त्यावेळी सचिन दुचाकीरवरून उतरून एका गल्लीमध्ये गेला. बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही. त्यामुळे गायकवाड याने आत जाऊन पाहिले असता तेथे सचिन बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. तेथे परिसरातील नागरिक जमा झाले होते. गायकवाडने एका व्यक्तीच्या मदतीने सचिनला दुचाकीवरून शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले.

हेही वाचा – राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

हेही वाचा – समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

प्राथमिक माहितीनुसार, सचिन त्या गल्लीतील एका दुचाकीला चावी लावत होता. त्यावेळी त्याला चोर समजून एका व्यक्तीने लाथा-बुक्क्याने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.