मुंबई : कचरा वाहून नेणाऱ्या हिरव्या रंगाच्या गाड्यांच्या जागी आता नव्या रंगसंगतीच्या कचरागाड्या येत्या काही महिन्यात रस्त्यावर दिसणार आहे. मुंबई महापालिकेने कचऱ्याच्या गाड्यांसदर्भात नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. नव्याने येणारी वाहने मागील बाजून झाकलेली असतील तसेच कचऱ्यातून निघणारे पाणी साठवण्यासाठी यात स्वतंत्र व्यवस्था असेल त्यामुळे रस्त्यावर पाणी सांडणार नाही. या नवीन गाड्यांची सेवा लवकरच मुंबई महापालिका घेणार आहे. दरम्यान, ही यंत्रणा म्हणजे घनकचरा विभागाचे खासगीकरण असल्याचा दावा करून कामगार संघटनांनी या नव्या कंत्राटाला आधीच विरोध सुरू केला आहे.
घरोघरी गोळा केलेला कचरा उचलणाऱ्या हिरव्या रंगाच्या गाड्या लवकरच मुंबईच्या रस्त्यावरून हद्दपार होणार आहेत. त्या जागी पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या आकर्षक रंगसंगतीच्या गाड्या येणार आहेत. कचरा वाहून नेताना रस्त्यावर सांडणारे घाणपाणी, कचरागाडी बाजून गेली तरी येणारी दुर्गंधी हे दृश्य बदलण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. त्याकरीता मुंबई महापालिकेने कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांसह त्यावरील इतर सर्व प्रकारची सेवा घेण्याचे ठरवले आहे. त्यात कचरा संकलन, कचरा वाहून नेणे, गाड्यांची व कचरापेट्यांची स्वच्छता या गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांतील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कामांचे फेरनियोजन करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत कचरा संकलन आणि परिवहनासाठी एकच यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून कचरा संकलनासाठी विशेष प्रकारच्या, जास्त वहन क्षमता असलेल्या व अधिक दर्जेदार तसेच आकर्षक रंगसंगतीयुक्त वाहनांचा वापर केला जाणार आहे. मुंबईत दररोज सुमारे ७२०० ते ७३०० टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलित करून पुढील प्रक्रियेसाठी क्षेपणभूमीमध्ये नेला जातो. यासाठी रोज सुमारे १ हजार ३३४ वाहने वापरली जातात. त्यापैकी काही वाहने महानगरपालिकेच्या मालकीची तर काही कंत्राटदारांमार्फत नेमण्यात आली आहेत. तर कंत्राटदारांच्या वाहनांवर काही ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कामगार असलेले मोटर लोडर काम करतात. मात्र यापुढे संपूर्ण मुंबईत कचरा उचलण्यासाठी कचरा संकलन करुन वाहून नेण्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा कंत्राटदारांची वापरण्यात येणार आहे. याला सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राट असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र कामगार संघटनांनी या कंत्राटाला विरोध केला असून ही सेवा म्हणजे खासगीकरण असल्याचा आरोप केला आहे.
सफेद आणि पिवळ्या रंगाच्या गाड्या
एकूण वाहनांपैकी सुमारे १० ते १५ टक्के वाहने इलेक्ट्रिक स्वरुपाची असणार आहेत. कचरा उचलणे, कचरा पेटींची निगा, परिरक्षण, परिवहन आदी कामांसाठी एकच यंत्रणा कार्यरत राहणार आहे. ओला कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये कचऱ्यांतून निघणारे सांडपाणी वाहनातच साठविण्याची व्यवस्था असेल. परिणामी, रस्त्यावर पाणी सांडणार नाही तसेच दुर्गंधीही पसरणार नाही. नंतर, या सांडपाण्याची क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात येणार आहे.चौकट
या सेवेमुळे कचरागाड्यांवर कचरा उचलून टाकणाऱ्या मोटर लोडरला काम उरणार नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील कचरा झाडण्याचे काम दिले जाणार आहे. त्यालाही कामगार संघटनांनी विरोध केला आहे. कचरा संकलन व परिवहन हे अत्यंत महत्त्वाचे काम जर कंत्राटदारांकडून करून घेण्यात आले तर पालिकेला सर्वस्वी कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागेल, अशी भूमिका बेस्ट कामगार सेनेने घेतली आहे. तर दि म्युनिसिपल युनियननेही या कंत्राटाला विरोध केला आहे. अशी सेवा घेण्याअगोदर प्रशासनाने कामगारांना विश्वासात घ्यायला हवे होते. तसेच या सेवेमुळे उद्या पालिकेची यानगृहे बंद पडतील अशी भीती युनियनचे रमाकांत बने यांनी व्यक्त केली आहे.
प्रस्तावित योजनेमुळे मोटर लोडर कामगारांचे हक्क बाधित होणार नाहीत अथवा त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. या कामगारांचे सर्व प्रकारचे आर्थिक लाभ अबाधित राहण्यासोबतच त्यांच्या वारसा हक्कास (पी. टी. केस) बाधा येणार नाही. तसेच, महानगरपालिकेचे सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही यानगृह (गॅरेज) बंद केले जाणार नाहीत, असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.