मुंबई : मुंबईत २६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परळ येथील केईएम रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. रुग्णालयातही गुडघाभर पाणी साचल्याने रुग्ण सेवेवर परिणाम झाला. या घटनेची उच्च न्यायालयाने गुरूवारी गंभीर दखल घेतली. तसेच, रुग्णालय जलमय झालेच कसे, रुग्णालयात पाणी शिरलेच कसे, अशी प्रश्नांची सरबत्ती करून रुग्णालयाची तातडीने पाहणी करण्याचे आणि भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारसह महापालिकेला दिले.

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये २०२३ मध्ये झालेल्या मृत्युसत्राप्रकरणी न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली होती. या रुग्णालयांमध्ये कर्मचारी आणि वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे विशेषतः कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या अभावामुळे बालकांचा मृत्यू झाला होता. या याचिकेच्या माध्यमातून केईएम रूग्णालयात पावसाचे पाणी साचल्याचा मुद्दा गुरुवारी वकील मोहित खन्ना यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिला. उपरोक्त प्रकरणात खन्ना यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पावसाचे पाणी शिरल्याने केईम रुग्णालयातील बालरोग विभाग जलमय झाल्याच्या बातम्यांचा खन्ना यांनी दाखला दिला. तसेच, त्याची छायाचित्रेही न्यायालयात सादर केली. रुग्णालयातील केवळ बालरोग विभागच नाही, तर रुग्णालयाच्या संपूर्ण तळमजल्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पहिल्याच पावसाने रुग्णालयात ही स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे, आताच उपाययोजना केल्या नाहीत, तर ही स्थिती आणखी बिकट होईल, अशी भीतीही खन्ना यांनी व्यक्त केली.

न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने खन्ना यांनी सादर केलेली छायाचित्रे पाहिल्यानंतर रुग्णालयात पाणी शिरसेच कसे, अशी विचारणा सरकार आणि महापालिकेला केली. त्याला उत्तर देताना रुग्णालय सखल भागात असल्याने रुग्णालयाच्या आवारात पाणी साचल्याचा दावा सरकारच्या वतीने बाजू मांडताना वकील प्रियभूषण काकडे यांनी केला. न्यायालयाने या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. तसेच, रुग्णालय आणि रुग्णालयाचा परिसर नेहमी स्वच्छ असला पाहिजे. ते अशा प्रकारे पावसाचे पाणी साचल्याने जलमय होऊ शकत नाही, असे न्यायालयाने सुनावले. रुग्णालयात पाणी शिरलेच कसे या आपल्या प्रश्नाचाही न्यायालयाने पुनरूच्चार केला व ही स्थिती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे सरकार आणि महापालिकेला बजावले.

रुग्णालयाच्या स्थितीबाबतही नाराजी

केईएम रुग्णालय हे एकेकाळी देशातील रुग्णसेवेसाठीचे सर्वोत्तम रुग्णालय म्हणून प्रसिद्ध होते. देशभरातून नागरिक येथे उपचारासाठी यायचे. तथापि, आताची रुग्णायाची स्थिती दयनीय आहे. ही स्थिती बदलण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. केईएम रुग्णालय व्यवस्थापन अशा प्रकारे रूग्णालयात पावसाचे पाणी साचू कसे देऊ शकते, असा प्रश्न करून रुग्णालय स्वच्छ असले पाहिजे. तेथे मूलभूत स्वच्छता असलीच पाहिजे, असेही न्यायालयाने अधोरेखीत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपाययोजनांचा अहवाल सादर करा

रुग्णालयांतील ही दयनीय स्थिती बदलण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाकडून सूचना घ्या आणि त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने काकडे यांना दिले. त्याचवेळी, महापालिकेला नोटीस बजावली व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला तातडीने भेट द्यावी, तसेच, स्थिती सुधारण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला उपाययोजना सुचवण्याचे आदेश दिले.