मुंबई : देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यासाठी तेथे अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले असून आता हा जुना कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. या कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २३६८ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे १०० वर्षांपासून कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली असून महसूल व वन विभाग विभागाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती. तेव्हापासून पालिका प्रशासनाने ही कचराभूमी रिकामी करण्यासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली होती. अखेर घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कामासाठी आता निविदा मागवल्या आहेत. इच्छुक निविदाकारांना ३ जूनपर्यंत निविदा भरता येणार आहे.
मुलुंड कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या पद्धतीने बायोमायनिंगचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसाच प्रकल्प देवनार कचराभूमीवर लावण्याकरीता निविदा मागवण्यात आली आहे. या प्रकल्पातून वेगळी होणारी माती, राडारोडा तसेच इतर कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. कचराभूमीवरील कचऱ्यातून ६५ टक्के माती, वाळू, राडारोडा निघतो. तर ३५ टक्के कचरा इतर स्वरुपाचा असतो, ज्यात प्लास्टिकचा समावेश असतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यातील माती वाहून नेण्यासाठी दरदिवशी १२०० गाड्यांचा वापर करावा लागणार आहे. दरदिवशी २३ हजार मेट्रीक टन कचऱ्याची विल्वेवाट लावण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. पावसाळा धरून तीन वर्षे या कामासाठी लागतील असा अंदाज आहे.
मुलुंड कचराभूमीचे काम सहा वर्षे चालले
दरम्यान, देवनार कचराभूमी तीन वर्षात रिकामी करून जमीन प्राप्त करण्याचे उद्दीष्ट्य मुंबई महापालिकेने ठेवले आहे. असे असले तरी मुलुंड कचराभूमीची जमीन प्राप्त करण्यासाठी दिलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामासाठी आतापर्यंत सहा वर्षे लागली आहेत. त्यामुळे देवनार कचराभूमी रिक्त करण्याचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य गाठताना पालिकेच्या यंत्रणेची दमछाक होणार आहे. या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर वेगळी होणारी माती, राडारोडा व इतर कचरा यांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन लागणार आहे.
असा असेल कामाचा व्याप
एकूण जुन्या कचऱ्याचे अंदाजित वजन – १८५ लाख मेट्रीक टन
एकूण व्याप्त जागा – ११० हेक्टर
कचरा हटवण्यासाठी एकूण अंदाजित खर्च – २,३६८ कोटी
कंत्राट कालावधी – तीन वर्षे (पावसाळासहित)
दरदिवशी कचऱ्याची विल्हेवाट – २३ हजार मेट्रीक टन
वाहनांऱ्या फेऱ्या – १२०० प्रतिदिन