मुंबई: पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कौशल्याधारित उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पदवीस्तरावरील शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रमांची (अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम – एइडीपी) सुरूवात करीत आहे. ‘एईडीपी’ अंतर्गत पदवीस्तरावरील एकूण २० अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत सुरु केले जात आहेत.

‘एईडीपी’ अंतर्गतच्या अभ्यासक्रमात बी.एस्सी. (पेंट टेक्नॉलॉजी), बीएमएस (कस्टम्स क्लिअरन्स, फ्रेट फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक्स), बीएमएस (ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट), बॅचलर ऑफ इंटिरिअर डिझाइन, बी.एस्सी. (फिटनेस), बी.एस्सी. (एआय अँड एमएल), बी.एस्सी. (एरोनॉटिक्स), बी.एस्सी. (बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स), बी.ए. (ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशन अँड डिझाइन), बीएमएस (कॅपिटल मार्केट्स), बीएमएस (इव्हेंट मॅनेजमेंट अँड पब्लिक रिलेशन्स) यासह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सर्व अभ्यासक्रम नामांकित उद्योग भागीदार आणि व्यावसायिक संस्थांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांसाठी लागू असणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत ८ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.

अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा : ९९८७३९५४५७, ८१०४४१२०७१, तसेच https://www.gicededu.co.in/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा.पदवी स्तरावरील शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी अभ्यासक्रम या योजनेअंतर्गत तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना किमान एक सत्र (२० श्रेयांक) आणि चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी दोन सत्रे (४० श्रेयांक) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल. या दरम्यान विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या श्रेयांक आराखड्यानुसार (क्रेडिट फ्रेमवर्क) शैक्षणिक श्रेयांक मिळणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई विद्यापीठाने या शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या बीओएटी-डब्ल्यूझेडसोबत सहकार्य करार केला आहे. तर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उद्योग समूहांशीही करार करण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतातील उच्च शिक्षणात परिवर्तन घडविणारा ‘एईडीपी’ हा महत्वाचा उपक्रम असून त्या दिशेने मुंबई विद्यापीठाने हे पाऊल टाकले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाचा अनुभव मिळणार असून रोजगारक्षमतेत वृद्धी करण्याचे ध्येय गाठता येणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.