मुंबई : विषारी द्रव प्राशन केल्यामुळे कांदिवली येथील एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.  पतीसोबत वैयक्तिक मुद्द्यांवरून वाद झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते. मृत महिला पती आणि दोन मुलींसह कांदिवली येथे राहत होती.

समता नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री महिला आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वाद झाला होता. विविध ठिकाणी जाऊन योगावर्ग घेण्यापेक्षा ऑनलाईन वर्ग घ्यावेत अशी पतीची इच्छा होती. त्यानंतर रविवारी सकाळी पतीला ती खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यांनी तिला खासगी रुग्णालयात नेले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह घरी परत नेल्यानंतर अत्यसंस्कारसाठी सर्व नातेवाईकांना कळवण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक घरी जमू लागले. त्यावेळी परिसरातील एका व्यक्तीने समता नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याच्या घरी गेले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.

हेही वाचा >>> मुंबई : आर्थिक घोटाळ्यातील सर्व झोपु प्रकल्पांवरील स्थगिती ‘ईडी’कडून मागे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर आपण मानसिकदृष्ट्या खचलो असून कायदेशीर प्रक्रियेबद्दल माहिती नसल्याने पत्नीचे पार्थिव थेट घरी आणले, असे पोलिसांनी केलेल्या चौकशीत पतीने सांगितले. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. महिलेने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पण पोलिसांनी त्याबाबत कोणतीही माहित दिलेली नाही. पोलीस दोन्ही मुलींचे जबाबही नोंदवणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.