मुंबई : बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेने ४ जानेवारीपासून प्रत्येक बुधवारी घरोघरी जाऊन ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील ३२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सहा हजारांहून अधिक नागरिकांना उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळली आहेत.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची रक्तदाबाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ४ जानेवारीपासून प्रत्येक बुधवारी आशा सेविका किंवा आरोग्य सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणात आतापर्यंत २१ हजार ४८२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून यापैकी ३० वर्षांवरील ३२ हजार ४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी चार हजार ४३६ नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले. तर उच्च रक्तदाबाचे दोन हजार २४७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा >>> भांडुपमध्ये पाणीपुरवठा बंद

उच्च रक्तदाब असलेल्या चार हजार ४३६ नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधे देण्यात आली. तसेच पुढील उपचारासाठी रुग्णालयास भेट देण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लक्षणे आढळलेल्या रुग्णांची किमान तीन वेळा तपासणी करून त्यांचे अचूक निदान करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयातील तपासणीत आढळले २१ हजार रुग्ण

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचीही मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी करण्यात येत असून २ ऑगस्टपासून रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. २ ऑगस्ट २०२२ ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ८० हजार ८०३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून या तपासणीमध्ये नऊ हजार ३५१ जणांना उच्च रक्तदाब, तर नऊ हजार २८ जणांना मधुमेह असल्याचे आढळून आले. तसेच तीन हजार ५१८ जणांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असा दोन्ही त्रास असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.