‘शिवसेना आणि भाजपाला मत देण्याच्या तयारी असणाऱ्या मुंबईकरांनी आरेबद्दल मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे’ असा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी ट्विटवरुन आरे येथील ४०० हून अधिक झाडे कापण्यात आल्याच्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. उच्च न्यायलयाने शुक्रवारी संध्याकाळी आरे येथील मुंबई मेट्रो तीनच्या जागेसाठी वृक्षतोड करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर एका रात्रीत प्रशासनाने काही शे झाडे कापली. आरेमध्ये वृक्षतोड सुरु असल्याचे वृत्त समजताच अनेक पर्यावरणप्रेमींनी आरे कारशेडच्या ठिकाणी धाव घेतली. ट्विटवरही या घटनेचे पडसाद दिसून आले. #AareyForest हा हॅशटॅग शुक्रवार रात्रीपासून ट्विटरवर टॉप ट्रेंण्ड होत आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या झा यांनी या वृक्षतोड करण्याच्या निर्णयाला राज्यातील युती सरकारला जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना भाजपाला मत देण्याच्या तयारीत असलेल्यांना आरेसाठी आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. ‘ज्या ज्या मुंबईकरांनी शिवसेना आणि भाजपाला मत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी आरेसाठी मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे अशी नम्र विनंती आहे. आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे ट्विट करणं तसेच आंदोलन करत असल्याचं नाटकं करणं बंद करा. जे बोलता ते करुन दाखवा,’ असा टोला झा यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

आणखी वाचा- सरकार किती’आरे’रावी करणार – धनंजय मुंडे

आरे येथील मेट्रोच्या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने राज्य सरकार आणि मुंबई रेल मेट्रो कॉर्पोरेशनला दिलासा मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री आठपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली.  आरेतील अनेक झाडे इलेक्ट्रिक करवतीने झाडे तोडली गेली. यामुळे स्थानिकांना आरेतील झाडे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर लगेच काही तासांमध्ये तोडली जात असल्याचे समजले. यानंतर रात्रीच्या अंधारातही मोठ्या संख्येने नागरिकांनी आरे मेट्रो कारशेडच्या जवळ गर्दी केल्याचे पहायला मिळाले. वृक्षतोड करण्याआधी या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वृक्षतोड होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांना जाऊ दिले नाही. स्थानिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी कारशेडच्या परिसराच्या बाहेर लावण्यात आलेल्या गेटवरच ‘आरे वाचवा’ची घोषणाबाजी सुरु केली. आरेमधील झाडे वाचवण्यासाठी नागरिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये चांगलीच वादावादी झाली. सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी राज्य सरकार, एमएमआरसीएल विरोधात संताप व्यक्त केला.