मुंबई : राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी पोटी नाफेड आणि एनसीसीएफला हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. राज्यात ११ लाख टन सोयाबीन ४८९२ रुपये हमीभावाने खरेदी केले होते, ते सोयाबीन नाफेड, एनसीसीएफला आता सरासरी ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल दराने विकावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या सोयाबीन खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गतवर्षी राज्यात सरासरी ५० लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. त्यातून सरासरी ७० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. हमीभाव ४८९२ रुपये असताना बाजारात सोयाबीन चार हजार रुपयांवर होते, त्यामुळे नाफेड, एनसीसीएफने हमीभावाने खरेदी सुरू केली. चार महिन्यांहून जास्त काळ खरेदी सुरू होती. तरीही एकूण उत्पादनाच्या जेमतेम १३ टक्के सोयाबीन खरेदी झाली. उर्वरीत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी ८०० ते ९०० रुपयांचे नुकसान सहन करून खासगी बाजारात सोयाबीन विकावे लागले. विशेष म्हणजे हमीभावाने खरेदी सुरू झाल्यानंतरही खासगी बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ न झाल्यामुळे हमीभावाने खरेदीचा मूळ उद्देशही साध्य झाला नाही.
आता नाफेड, एनसीसीएफने खरेदी केलेल्या सोयाबीनचा लिलाव सुरू आहे. त्याला सरासरी ४३०० ते ४४०० रुपये दर मिळत आहे. खरेदी विक्रीत थेट ४०० रुपयांचे नुकसान होत आहे. तर खरेदी, वाहतूक, बारदाणा आणि गोदामातील साठवणुकीचा खर्च प्रति क्विंटल सरासरी ३०० रुपये आहे. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफला सोयाबीन व्रिक्रीत प्रति क्विंटल ७०० ते ८०० रुपयांचे नुकसान होत आहे. ११ लाख टन सोयाबीन खरेदी झाल्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफला फक्त महाराष्ट्रात हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रा इतकेच क्षेत्र मध्य प्रदेशात आहे, त्यामुळे मध्य प्रदेशातही सुमारे हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
सोयाबीन खरेदीचे गौडबंगाल
राज्यातील खरीप क्षेत्र सरासरी – १५० लाख हेक्टर
सोयाबीन लागवड क्षेत्र – ५० लाख हेक्टर
सोयाबीन उत्पादन – ७० लाख टन
हमीभावाने खरेदी – ११ लाख टन
सोयापेंडीच्या निर्यातीला तातडीने अनुदान द्या – पाशा पटेल
केंद्र सरकारने सोयापेंडीच्या निर्यातीला परवानगी आणि अनुदान दिले असते. बाजारात सोयाबीनचे दर सरासरी पाच हजार रुपये क्विंटलवर गेले असते. दरवाढ झाल्यामुळे सरकारला सोयाबीन हमीभावाने खरेदी करावे लागले नसते. शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आठ – आठ दिवस थांबले होते. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वेगळाच. आता एनसीसीएफ आणि नाफेडने विक्री सुरू केल्यानंतर बाजारातील दरही पडले आहेत. यंदा केंद्र सरकारने सोयाबीनला ५,३२८ रुपये हमीभाव केला आहे. पण, बाजारात चार हजार रुपयेही दर मिळण्याची शक्यता नाही. केंद्र सरकारने तातडीने सोयापेंडीच्या निर्यातीला परवानगी आणि निर्यात अनुदान जाहीर करण्याची गरज आहे, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.