मुंबापुरीत ढोल-ताशांच्या निनादात नवरात्रोत्सवाला रंग चढत असताना तरुणाईंच्या उतावळेपणामुळे उत्सव डोकेदुखी ठरू नये यासाठी अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘महिला सुरक्षारक्षका’ची नियुक्ती केली आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा घटनांवर अंकुश बसवण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांकडून हा नवा उपक्रम राबविला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कराटे आणि बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना हाताशी घेऊन खासगी सुरक्षा कंपनीकडून नवरात्रोत्सव मंडळांना सुरक्षा पुरवली जात आहे.
शहराच्या सांस्कृतिक भावजीवनात गणेशोत्सवानंतर उत्सवपूर्ण वातावरण निर्माण होते ते नवरात्रीत. नवरात्रीचा हा अपूर्व उत्साह गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने वाढत आहे. मात्र दिवसागणिक वाढत जाणाऱ्या या उत्सवात महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून ‘महिला सुरक्षे’साठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु असे असूनही गेल्या काही वर्षांत नवरात्रोत्सवात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर अनेक गरबा आणि दांडिया आयोजकांनी पुढाकार घेऊन महिलांची सुरक्षा ‘महिला सुरक्षारक्षकां’कडे सोपवली आहे.
आम्ही खासगी सुरक्षा संस्थेच्या मदतीने दहा महिला सुरक्षारक्षकांची मदत घेत आहोत. या सर्व महिलांनी कराटे आणि बॉिक्सगचे प्रशिक्षण घेतले आहे. कोणतीही आगळीक घडू नये आणि महिलांना आनंदाने उत्सवात सहभाग घेता यावा यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. एखादी व्यक्ती महिलांची छेडछाड काढत असल्यास त्याचे चित्रीकरण करून त्याच्या घरी पाठवण्यात येणार असल्याचे घाटकोपर गुजराती समाज गरब्याचे आयोजक जिग्नेश खिलानी यांनी सांगितले. याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव ४० गुप्तहेर आणि १०० कार्यकत्रे यांचीही गस्त आहे. त्यामुळे महिलांना सुरक्षित वाटत असून गरब्यासाठी त्याचा उत्साह वाढला असल्याचे खिलानी यांनी सांगितले.
सध्या प्रत्येक क्षेत्रात शारीरिक बळाच्या जोरावर सुरक्षारक्षकाच्या गणवेशात ‘पुरुष’च असतो व तो अत्याचार करणार नाही याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नवरात्रोत्सव मंडळे महिलांची सुरक्षा महिलांच्या हाती देत असतील तर ही निश्चित एक चांगली सुरुवात आहे. या उपक्रमामुळे महिलांना उत्सवात आनंदाने भाग घेता येईल, मुक्तपणे वावरता येईल, असे एका खासगी विमान कंपनीत नोकरी करत असलेल्या खुशबू मोदी या तरुणीने सांगितले. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात असतो आणि रात्रीच्या वेळी महिलांची छेड काढण्याची शक्यताही अधिक असते. मात्र यावर्षी अनेक मंडळांनी महिला सुरक्षारक्षकांकडे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्याने यंदाचा नवरात्रोत्सव हा विशेष ठरणार आहे. यासोबतच मुंबई पोलिसांचे महिला छेडछाडविरोधी पथक उत्सवावर करडी नजर ठेवून आहेत. त्यामुळे टवाळखोरांवर चाप बसेल, असा दावा मुंबई पोलिसांतील एका महिला अधिकाऱ्याने केला आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात महिला सुरक्षारक्षकांना संस्थेकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येते. नियम ठरवून दिले जातात. एखादी घटना घडल्यास कायद्याच्या चौकटीत राहूनच ती हाताळी जाते. महिलांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य हा संस्थेचा उद्देश आहे. महिलाच महिलेची सुरक्षा उत्तमपणे करू शकते. त्यामुळे आम्ही हा उपक्रम हाती घेतला असल्याचे खासगी सुरक्षा संस्थेचे संस्थापक रामचंद्र नाईक यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2015 रोजी प्रकाशित
नवरात्रोत्सवात सुरक्षेची जबाबदारी ‘नारी शक्ती’च्या हाती
कराटे आणि बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना हाताशी घेऊन खासगी सुरक्षा कंपनीकडून नवरात्रोत्सव मंडळांना सुरक्षा पुरवली जात आहे
Written by रोहित धामणस्कर

First published on: 15-10-2015 at 06:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri mandals in mumbai give responsibility of security to trained womens