मुंबई : राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, लेखिका आणि प्रख्यात वकील डॉ. पौर्णिमा आडवाणी यांचे १ एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती डॉ. शैलेश हाथी आणि मुलगी पूजिता असा परिवार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून डॉ. आडवाणी कर्करोगाशी झुंज देत होत्या. पौर्णिमा आडवाणी या २००२ ते २००५ या दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ‘द लॉ पॉइंट’ या कंपनीच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. मुंबई विद्यापीठ, क्वीन्सलँड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि अन्य ठिकाणी त्यांनी व्याख्यात्या म्हणूनही काम केले. १९९७ मध्ये त्यांनी ‘इंडियन ज्युडिशियरी : ए ट्रिब्यूट’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकासाठी २००३ मध्ये आचार्य तुलसी कार्तित्व पुरस्काराने डॉ. आडवाणी  यांना गौरविण्यात आले होते.  गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते.