कळवा ते ऐरोली या सध्याच्या रेल्वेमार्गावर उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वे मार्ग बांधण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून, या मार्गामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना थेट कल्याण-डोंबिवली गाठणे शक्य होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
ठाणे रेल्वे स्थानकावर सध्या बराच ताण पडतो. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशानेच कळवा-ऐरोली या मार्गावर उन्नत रेल्वे मार्ग बांधून कल्याण-डोंबिवलीकडील प्रवाशांना थेट नवी मुंबईत जाणे शक्य होईल, असे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुभाष भोईर (शिवसेना) यांच्या लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात सांगितले. दिवा तसेच आसपासच्या परिसरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता दिव्याहून तळोज्यापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करावी, अशी मागणी भोईर यांनी केली. ठाण्यात मेट्रो सुरू करण्याचे गाजर गेली अनेक वर्षे दाखविले जाते. पण प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नाही याकडे संजय केळकर (भाजप) यांनी लक्ष वेधले.
राज्यमंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान होत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ठाणे व आसपासच्या परिसरातील वाढते नागरिकीकरण व लोकसंख्या याचा विचार करता वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. ठाणे मेट्रोला या वर्षांत मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रताप सरनाईक (शिवसेना) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
नवी मुंबईत मेट्रोची नवी प्रणाली तयार करण्यात आली आहे. यानुसार बेलापूर-खारघर-तळोजा-कळंबोली-खांदेश्वर ते प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ असा मेट्रो मार्ग बांधण्याची योजना आहे. अंधेरी पूर्व ते मानखुर्द व्हाया घाटकोपर ते पनवेलपर्यंत मेट्रो मार्ग बांधून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ जोडण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ठाण्यात ‘बेस्ट’ला अनुकूल
ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याची परिवहन सेवा वाहतूक सेवा देण्यात अपयशी ठरल्याने ठाणे परिवहन सेवेचे ‘बेस्ट’मध्ये विलीनीकरण करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) यांनी केली असता, ठाणे महानगरपालिकेने तसा प्रस्ताव पाठविल्यास राज्य शासन त्याला मान्यता देईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.