राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांची राजकीय धुळवड सुरू असताना दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यातील मोठय़ा, मध्यम व लहान धरणांतील सरासरी फक्त २७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. १० हजाराहून अधिक वाडय़ांना व गावांना ३५६२ इतक्या मोठय़ा प्रमाणावर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे नव्या वर्षांपासूनच टंचाई परिस्थिती हळूहळू तीव्र होत चालली होती. परिणामी धरणातील पाणीसाठाही बेताचाच होता. जानेवारीमध्ये ६० ते ६५ टक्क्य़ांच्या आसपास असणाऱ्या पाणीसाठय़ात लक्षणीय घट झाली आहे. राज्य सरकारच्या वतीने सोमवापर्यंतची पाणीसाठय़ाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोकण विभागात मोठय़ा धरणांमध्ये ६५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ८३ टक्के पाणीसाठा होता. मराठवाडय़ातील धरणांमध्ये गेल्या वर्षी ४५ टक्के पाणीसाठा होता, त्या तुलनेत या वेळी फक्त ७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नागपूर-३७ टक्के, अमरावती-२८ टक्के, नाशिक-१७ टक्के आणि पुणे २९ टक्के अशी सध्याची पाणी साठय़ाची स्थिती आहे.
राज्यात गेल्या वर्षी या तारखेला ४३ टक्के पाणीसाठा होता. आता सर्व धरणांतील मिळून फक्त २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महिनाभरातटँकरची संख्याही वाढली आहे. एप्रिल सुरू होताच उन्हाळ्याचीही तीव्रता जाणवू लागली आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी कसे पुरणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.