मुंबई : देशातील सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक मिळविणारे राज्य म्हणून महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे. औद्योगिकीकरणाचा मोठा वारसा लाभलेल्या राज्यात नवनवीन प्रकल्प गुंतवणुकीचे करार लक्षणीय प्रमाणात सुरू आहेत. देशातील पहिले एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठू पाहणाऱ्या राज्याच्या उद्यामशील जडणघडणीतील आगामी संधी आणि आव्हाने यांचा वेध घेणारे मंथन ‘लोकसत्ता’ने येत्या सोमवारी आयोजित केले आहे.
उद्योजक, तज्ज्ञ विश्लेषक, प्रशासन आणि धोरणकर्ते यांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या ‘लोकसत्ता उद्योगचर्चा’ या विशेष सत्रात महाराष्ट्रातील उद्योगांची स्थिती, उद्योजकांपुढील अडचणी आणि एक ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या अर्थव्यवस्थेतील संधी यांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत हे चर्चासत्र येत्या सोमवारी, ३० जून रोजी होत आहे.
व्यवसायसुलभ वातावरण, वीज, पाण्याची सुयोग्य सोय, शिक्षित-प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता, महामार्गांचे विस्तारित जाळे आणि निर्यात वाढीसाठी प्रोत्साहन यामुळे राज्यात उद्योगधंदे स्थिरावले आणि नवनवीन उद्योगही निरंतर येत आहेत. बड्या महानगरांतच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांतही ते फैलावत असल्याने रोजगाराच्या संधीही सर्वत्र उपलब्ध होत आहेत.
तथापि, उद्याोग विकासासाठी आणखी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या त्रुटी आहेत, उद्याोगांची उभारणी करताना कशाला महत्त्व दिले जावे, यासंदर्भात उद्याोजकांचेही काही म्हणणे आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम (एमएसएमई) उद्योगांची बड्या उद्याोगांना पूरक भूमिका अणि त्यांच्या अडचणी दूर करणे ही राज्याच्या सर्वांगीण विकासालाच चालना ठरेल. याबद्दलचे सखोल विचारमंथन म्हणून होत असलेले हे चर्चासत्र म्हणजे नामांकित उद्योजक, तज्ज्ञ विश्लेषक यांना सरकार आणि प्रशासनाशी थेट संवादाचे व्यासपीठच ठरेल.