मातृभाषेतून उत्तरे लिहिण्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द करण्याबरोबरच मुख्य परीक्षेत पात्रतेसाठी असलेले दोन भाषा विषय कायम ठेवण्याचा निर्णय ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ने (यूपीएससी) घेतला आहे. नव्या बदलांमुळे मातृभाषेतून परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. परंतु, दोन भाषा विषयांसाठी ६०० गुणांच्या लेखी परीक्षेचा ताण वाढणार असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे.
यूपीएससीने दोन दिवसांपूर्वी २०१३च्या मुख्य परीक्षेची सुधारित अधिसूचना जाहीर केली. १० मार्चला प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील अनेक जाचक अटी या नव्या अधिसूचनेत अपेक्षेप्रमाणे रद्द करण्यात आल्या आहेत. नव्या बदलांनुसार उमेदवारांना कोणत्याही अटीशिवाय मातृभाषेतून (प्रादेशिक) परीक्षा देता येणार आहे. या आधीच्या अधिसूचनेमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून झालेल्या उमेदवारांनाच मातृभाषेतून परीक्षा देण्याचा पर्याय खुला होता. याचबरोबर मातृभाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी देशातून किमान २५ उमेदवारांनी त्या भाषेतून परीक्षा देण्याचा पर्याय निवडणे बंधनकारक ठरविणारी जाचक अटही वगळण्यात आली आहे. याशिवाय २६ ऐच्छिक विषयांमधून भाषा साहित्य निवडायचे असेल तर संबंधित विषय पदवी स्तरावर अभ्यासलेला असावा, ही अटही काढून टाकण्यात आली आहे. निबंध विषयाची परीक्षा ३०० वरून २५० गुणांची करण्यात आली आहे. या बदलाव्यतिरिक्त जुन्या पॅटर्नमध्ये पात्रतेसाठी असलेले प्रत्येकी ३०० गुणांचे इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा हे दोन भाषा विषयही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलाव्यतिरिक्त जुन्या पॅटर्नमध्ये पात्रतेसाठी असलेले प्रत्येकी ३०० गुणांचे इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा हे दोन भाषा विषयही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त नव्या पॅटर्नमधील बदल कायम आहेत.

६०० गुणांचा भार
भाषा विषय कायम ठेवण्याच्या निर्णयाबद्दल उमेदवारांमध्ये नाराजीची भावना आहे. या विषयांचे गुण केवळ पात्रतेसाठी गृहीत धरले जातात. १० मार्चला जाहीर केलेल्या नव्या पॅटर्नमध्ये हे विषय वगळून भाषा विषयांचा भार कमी करण्यात आला होता. परंतु, सुधारित पॅटर्नमध्ये दोन्ही भाषा विषय कायम करण्यात आल्याने ६०० गुणांचा भार पुन्हा एकदा वाढल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. ‘प्रत्यक्ष गुणवत्ता यादी तयार करताना त्यांचा कोणताही कस लागत नसल्याने हे विषय वगळायला हवे होते. पण, पात्रतेसाठी हे विषय महत्त्वाचे ठरत असल्याने अनेकदा उमेदवारांच्या निवडीत या विषयांचा अडथळा ठरतो,’ अशी प्रतिक्रिया ‘लक्ष्य अकादमी’चे अजित पडवळ यांनी व्यक्त केली. हे दोन विषय वगळता लेखी आणि मुलाखत (२७५ गुण) मिळून आता यूपीएससीसाठी एकूण २ हजार २५ गुणांची मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे.