मुंबई: ठाण्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या मुंबई विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये २४ तासांत ढगाळ वातावरण राहणार असून सायंकाळी हलक्या सरींची शक्यता आहे. यादरम्यान कमाल आणि किमान तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सिअस राहील.

आणखी वाचा-अंधेरी, जोगेश्वरीत उद्या पाणीपुरवठा बंद, आजच पाणीसाठा करावा लागणार

आज ठाणे तसेच पालघर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, नाशिक, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन ते चार तासांत नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर दक्षिण छत्तीसगढ आमि तेलंगणा येथेही चक्राकार वारे वाहत आहेत. बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे.

आणखी वाचा-नंदूरबार, धुळे, नाशिकला हवामान विभागाचा इशारा; दुपारनंतर वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता

जळगाव येथे वादळी पाऊस

जळगाव येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. वादळी वाऱ्याबरोबर विजाही कडाडत होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळ्यात पावसाची हजेरी

धुळे शहरातदेखील आज पावसाने हजेरी लावली. काही भागात गारादेखील पडल्या आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागात गारांसह जोरदार पाऊस पडला.