मुंबई : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे जाहीर करूनही तसा नवा आदेश काढण्यास चालढकल केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. पहिलापासून मराठी व इंग्रजी अशा दोनच भाषा शिकविल्या जातील, असा आदेश लवकरात लवकर जारी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाचे कारण पुढे करीत येत्या शैक्षणिक वर्षात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीव्र पडसाद उमटल्यानंतर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली होती. मात्र गेले जवळपास दोन महिने झाले तरी याबाबतचा शासन निर्णय निघालेला नाही. यावरून मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून हिंदी सक्तीला स्थगितीचा शासन निर्णय त्वरित काढण्याची मागणी केली आहे. ‘मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा असतानाही ती शिकण्याची सक्ती का केली जाते, असा सवाल राज यांनी केला आहे. कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जाते, हे माहीत नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावता, अशी विचारणाही त्यांनी केली.

पत्रात काय?

एकीकडे हिंदी सक्तीला स्थगितीची घोषणा तर दुसरीकडे हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला सरकारने केव्हाच सुरुवात केल्याची माहिती आहे. पण सरकारने आपल्या निर्णयाशी घुमाजाव केले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभे करेल, त्याला सरकार जबाबदार असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली आहे. मंत्री महोदय आपण, आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात. आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांसारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार?