मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक संयुक्त मुलाखत काही वेळापूर्वीच घेण्यात आली. या मुलाखतीचं औचित्य होतं वर्ल्ड चाईल्ड ओबेसिटी. लहान मुलांचं वाढतं वजन, बैठी जीवनशैली, मोबाइलचा वाढता वापर, मैदानी खेळ बंद होणं या सगळ्या गोष्टींवर हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची मुलाखत पार पडली. यावेळी राज ठाकरे म्हणाले वजन कमी कसं करायचं कळलं असतं तर मीच वजन कमी केलं नसतं का? असा प्रश्न विचारला. तसंच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जायचं आहे मी चायनीजची ऑर्डर दिली आहे असंही राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

लहान मुलांच्या वाढत्या वजनाच्या समस्येवर राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, “मला कळलं असतं, तर मीच वजन कमी नसतं का केलं? आमच्या सूनेच्या रुपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले, पण तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं आहे.” राज ठाकरेंनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज ठाकरे म्हणाले, “देवेंद्रजी जे म्हणाले ती गोष्ट महत्त्वाची आहे. खेळ खेळले पाहिजेत. मी सकाळी टेनिस खेळतो, ४७० कॅलरीज बर्न होतात. मी योग्य मार्गावर आहे” असंही राज ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- संजय राऊत यांची राज ठाकरेंसह भाजपावर टीका! म्हणाले “ज्या कमळाबाईला आम्ही…”

मुलांना लठ्ठपणाचा आजार जडतोय हे कळलं पाहिजे

“आई वडिलांना मुलं गुटगटीत आहेत, म्हणजे तो आजार आहे, हे कळायला मार्ग नाही. हे कसं ओळाखायच हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, नाहीतर ती गोष्ट कळणारच नाही” असं राज ठाकरे म्हणाले. “सध्याच्या काळात फास्टफूडमुळे ही गोष्ट जास्त बळावत चालली आहे. पूर्वी घरातलं जेवण करायचे तेव्हा ही परिस्थिती नव्हती. जेव्हापासून बाहेरचे पदार्थ खाल्ले जाऊ लागले तेव्हापासून ही समस्या वाढीला लागली.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

फडणवीसांना दिल्लीत जायचं आहे मी चायनीजची ऑर्डर दिलीये

राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले, जपानचे काही व्हिडीओ मी पाहिले होते. शाळेत मुलांना डबा दिला जात नाही. तिथेच जेवण तयार केलं जातं आणि वाढलंही जातं. शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर इतर कशाचीही गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायचं आहे आणि मी चायनीजची ऑर्डर दिली आहे असं मिश्किल अंदाजात राज ठाकरे म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लहान मुलांच्या लठ्ठपणाचा विचार करताना महाराष्ट्रात टोकाची परिस्थिती दिसते. एकीकडे अंडरवेट मुलं आहेत, त्यांचा प्रश्न आहे तो प्रश्न नियंत्रणात आणतो आहोत. तर दुसरा विषय आहे की चाईल्ड ओबेसिटी म्हणजेच मुलांमध्ये येणारा लठ्ठपणा. शहरी भागांमधल्या लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. त्यात या सगळ्या प्रश्नांची काळजी घेणं आखलं आहे. राष्ट्रीय किशोर आरोग्य योजना आहे त्यामध्ये किशोरवयीन मुलांची काळजीही घेतली जाते आहे. तसंच आम्ही आणखी एक गोष्ट सुरु केलं आहे की शाळेत पीटीचा तास हा असलाच पाहिजे आणि शाळेत मैदान असलं पाहिजे. मैदानी खेळाची आवड मुलांना कशी लागेल? याकडे आम्ही लक्ष केंद्रीत करतो आहोत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.