मुंबई : एका मॉडेलने दाखल केलेले बदनामीचे आणि विनयभंगाचे प्रकरण, तसेच आरोपपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री राखी सावंत हिने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित मॉडेलने सूडाच्या भावनेने आपल्याविरोधात हे खोटे प्रकरण दाखल केल्याचा दावा राखी हिने याचिकेत केला आहे. तक्रारदार मॉडेलने केलेले खोटे आरोप आणि बदनामीकारक विधानांमुळे आपल्याला केवळ वैयक्तिक त्रासच होत नाही, तर आपली अभिनेत्री म्हणून असलेली कारकीर्दही उद्ध्वस्त होत आहे, असा दावाही राखी हिने गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला आहे.

हेही वाचा >>> मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधिंचा विरोध; अन्य धर्मीय येतील या भीतीने प्रकल्पाला विरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी हिने आपल्याशी संबंधित काही चित्रफिती प्रसिद्ध केल्या आणि आपल्याबाबत बदनामीकारक विधानेही केली, असा आरोप तक्रारदार मॉडेलने करून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रसारमाध्यमांना उपलब्ध करण्यात आलेली ही चित्रफित अश्लील मजकूर असलेली होती, असा दावाही तक्रारदार मॉडेलने केला होता. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी राखी हिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (ए) नुसार, आक्षेपार्ह विधान करून किंवा चित्रफित प्रसिद्ध करून महिलेचा विनयाचा भंग करणे, बदनानी करणे, धमकावण्यासह माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तथापि, गुन्ह्याची वास्तविकता तपासण्यात आल्यास तो विश्वासार्ह नाही. शिवाय, तक्रारदार मॉडेलशी असलेले सर्व वाद सामंजस्याने सोडवलेले आहेत. असे असताना गुन्हा प्रलंबित ठेवणे ही न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याची तक्रारदार मॉडेलची खेळी असल्याचा दावाही राखी हिने याचिकेत केला आहे. तसेच, विनयभंगाचा गुन्हा केवळ पुरूषांवर दाखल केला जातो, महिलेवर नाही, असा दावा करून राखी हिने तिच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.