मुंबईः आरडीएक्स या स्फोटकांनी भरलेला टॅंकर मुंबईवरून गोव्याला जात असून त्यात दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पण रत्नागिरी येथे तपासणीत या टँकरमध्ये काहीच संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणी दूरध्वनी करणाऱ्याला करणाऱ्या व्यक्तीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. टॅकर चालकाशी झालेल्या वादानंतर त्याला त्रास देण्यासाठी आरोपीने हा प्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास दूरध्वनी केला होता. स्वतःची ओळख पांडे म्हणून सांगणाऱ्या या व्यक्तीने मुंबईतून बोलत असल्याचे सांगितले. एक आरडीएक्सने भरलेला पांढऱ्या रंगाचा टँकर मुंबईतून गोव्याच्या दिशेने निघाला आहे, त्यात दोन पाकिस्तानी आहेत अशी माहिती त्याने दिली. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाच्या आणि गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती कळवण्यात आली.
हेही वाचा >>> मुंबईत संततधार, आज काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता
त्या माहितीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने वर्णन केलेला टँकर संगमेश्वर येथे नाकाबंदी दरम्याने थांबविण्यात आला. त्याची सर्व बाजूने पोलिसांमार्फत तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे देखील कसून प्राथमिक तपासणी केली. मात्र टँकरमध्ये कोणतीही बॉम्ब, बॉम्ब सदृश वस्तू अगर स्फोटक पदार्थ मिळालेले नाहीत, असे रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
या प्रकारानंतर गुन्हे शाखेने दूरध्वनी केल्याच्या संशयावरून एकाला कांजूरमार्ग येथून ताब्यात घेतले. निलेश कपिल पांडे अशी त्याची ओळख पटली असून त्याला पोलिसांनी अटक केली. घोडबंदर रोड येथे आरोपीच्या दुचाकीवरून जात असताना त्याचा टँकर चालकाविरोधात वाद झाला होता. त्यातून त्याने दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७७, १८२, ५०५(१) अंतर्गत लोकसेवकाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.