मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण गुजरातमधून परत आणावी, ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठ आणि राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. राज्य शासन मठाच्या पाठीशी असून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठातील महादेवी हत्तिणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्याकीय मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मठानेही आपल्या (पान ४ वर) (पान १ वरून) याचिकेमध्ये राज्य सरकारचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्याचे निराकरण करण्यात येईल. हत्तिणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल. आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्याप्रमाणे सुविधा देण्यात येतील. या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत याचिकेमध्ये करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणी आंदोलन केलेल्या नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.