मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यंदा वाढला असून मंगळवार सायंकाळपर्यंत तब्बल १ लाख ९१ हजार १६५ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. गेल्यावर्षी १ लाख ६१ हजार ३३६ विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज आले होते.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. साधारण पाच वर्षांपूर्वी डबघाईला आलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून बरे दिवस दिसू लागले आहेत. पुन्हा एकदा अभियांत्रिकी पदवीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. गेल्यावर्षी राज्यातील ३५० महाविद्यालयांत १ लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख १७ हजार ९४८ जागावर प्रवेश झाले होते. यंदा रिक्त जागांचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या अर्जांमुळे नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीची स्पर्धाही अधिक वाढणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील नवे प्रवाह, नवे विषय यांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. सायबर सुरक्षा, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अभ्यासक्रमांकडे ओढा आहे. त्याचप्रमाणे संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाही प्रतिसाद मिळतो आहे. त्याचबरोबर यंदा वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडल्यामुळेही अर्ज वाढल्याचे दिसते आहे.

हेही वाचा – राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश जारी

हेही वाचा – आनंदाचा शिधासाठीच्या निविदा प्रक्रियेतील अटीला आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत संधी देण्यात आली होती. आता तात्पुरती गुणवत्ता यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना ४ ते ६ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती व तक्रार नोंदवता येणार आहेत. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर पसंतीक्रम आणि गुणवत्ता फेरींचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) सांगण्यात आले.