मुंबई : प्रतिदिन १८ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे पवई तलाव प्रदुषणाच्या विळख्यात अडकला असून पवई तलाव प्रदुषणमुक्त करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण अभ्यासक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आता गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानिमित्त पवई तलावात मूर्ती विसर्जन करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र रहिवासी आणि पर्यावरण अभ्यासकांनी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्याला दिले आहे.

पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनसह अनेक स्थानिक रहिवाशांनी मुंबई महापालिका, तसेच पोलिसांना कृत्रिम तलावांना प्रोत्साहन द्यावे, तसेच मोठ्या सार्वजनिक मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र तलाव उभारण्याची विनंती केली आहे.

पवई तलावात मगर, तसेच इतर पक्षांचा अधिवास आहे. विसर्जनासाठी या तलावाचा वापर करण्यात आला तर आधीच झालेल्या प्रदूषणात आणखी भर पडेल आणि तलावाची प्रदुषण पातळी वाढेल, अशी भिती नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मागील महिन्यात पालिकेनेच तलावात दररोज १८ दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे सांगितले होते. सांडपाणी वळविण्यासाठी आणि शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ही कामे वेळेत केली जात नसल्याचा आरोप अभ्यासक तसेच स्थानिकांनी केला आहे. यापूर्वीही पवई तलावातील प्रदुषणाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, वेळीच त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद््भवली आहे.

पामेला चीमा, स्थानिक रहिवासी

संयुक्त पाहणी करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश पवई तलावाच्या सद्यस्थितीची दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने संयुक्त तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य पाणथळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे. डीके फ्लॅग फाऊंडेशनचे सदस्य डॉ. राकेश बक्षी यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) तक्रार केली आहे. सांडपाणी आणि जलपर्णीमुळे तलावातील प्राणवायूची पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मगरी आणि अन्य जलचरांना धोका निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय यासंदर्भात कोणतीही कारवाई वेळेत केली जात नसल्याची बाब डॉ. राकेश बक्षी यांनी निदर्शनास आणून दिली. ही बाब लक्षात घेऊन मुख्य खंडपीठाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य पाणथळ जमीन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सेव्ह पवई लेक’ विशेष मोहीम

काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालाव स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी ‘सेव्ह पवई लेक’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, जलपर्णीच्या वेढ्यातून पवई तलाव मुक्त करण्यासाठी सांडपाण्याच्या वाहिन्या अन्यत्र वळवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. याबरोबर तलावातील जलपर्णीही काढण्यात येत होती. तलावात दररोज प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याबद्दल स्थानिक रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त केली होती. जोपर्यंत तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी केला आहे.