मुंबई : राज्यातील वाढते गुन्हे व पोलिसांचे अपुरे संख्याबळामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचे तपास रखडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील पोलीस हवालदारांना आता गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. हवालदार व त्यावरील पदावरील सर्व अधिकारी गुन्ह्यांचा तपास करू शकतील.
त्यासाठी संबंधीत पोलीस हवालदार पदवीधर असावा, त्याने किमान सात वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी, तसेच त्याने गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथे सहा आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, असे निकष पूर्ण केल्यानंतरच त्यांना एखाद्या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार देण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पोलीस अधिकाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्यावर अनेक प्रकरणांचा ताण येतो. त्याचा विचार करून सरकारने हवालदारांनाही तपासाचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या, तुलनेने कमी गंभीर गुन्ह्यांचे तपास त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.