मुंबई : मुंबईतील मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ झाल्यानंतर, रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरमध्ये सुधारणा करण्यासाठी (रिकॅलिब्रेशन) ३१ मे २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आरटीओ विभागाकडून १ जूनपासून रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार होती. परंतु, रिकॅलिब्रेशन करण्यास मुदतवाढ दिली आहे, असा गैरसमज रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये आहे. तर, आरटीओ अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे पुन्हा आदेश न आल्याने, संपूर्ण कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर, रिकॅलिब्रेशन करण्यास मुदतवाढ देण्यात येण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी चालकांनी केली.
इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देऊन मुंबईतील मीटर रिक्षा आणि टॅक्सीचे फेब्रुवारी २०२५ मध्ये दरवाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचे अनुक्रमे २६ आणि ३१ रुपये भाडेवाढ झाली. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली. नवीन दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे आवश्यक असताना, मुंबईत सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सी चालकांना ३१ मेपर्यंत रिकॅलिब्रेशन करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु, बहुसंख्य रिक्षा, टॅक्सी चालकांचे रिकॅलिब्रेशन पूर्ण न झाल्याने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
मुंबई महानगरातील रिक्षा, टॅक्सीचे मीटर , रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया पूर्ण न झालेल्यांना दर दिवशी ५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल.
मुंबई महानगरातील १० आरटीओ कार्यालयांमध्ये ४.१७ लाख रिक्षा आणि ४४,८२५ टॅक्सी आहेत. वडाळा आरटीओमध्ये सुमारे ५०,८०० रिक्षांचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. अंधेरी आरटीओमध्ये सुमारे ४०,४०० रिक्षांचे, बोरिवली आरटीओमध्ये सुमारे ५०,४०० रिक्षांचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये सुमारे २१,३०० टॅक्सी, वडाळा आरटीओमध्ये सुमारे ५,३००, अंधेरी आरटीओमध्ये सुमारे २,७५० टॅक्सी आणि बोरिवली आरटीओमध्ये ४,३६० टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे.
मुंबई महानगरातील बहुसंख्य रिक्षा आणि टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन करणे अद्याप प्रलंबित आहे. काहींची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन करण्यासाठी सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. – ए. एल. क्वाड्रोस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन
मुंबई महानगरातील रिक्षा आणि टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन न झालेल्यांवर दरदिवशी ५० रूपये दंड आकारणी १ जूनपासून सुरू झाली आहे. प्रत्येक आरटीओ विभागाला याबाबत कळविण्यात आले आहे. – भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त (अति. कार्यभार)