मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात श्रीराम नवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली आहे. शोभायात्रेवीळी दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काल रात्रीपासून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजयुमो, विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरील कारवाईसाठी मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर निदर्शने केली. या घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रमाभत लोढा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

श्रीराम नवमीनिमित्त काल (३० मार्च) मालाडमधील मालवणी येथे भाजपा युवा मोर्चा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने शोभायात्रेचं आयोजन केलं होतं. ही शोभायात्रा मालवणी गेट क्रमांक ५ येथे पोहोचली. त्यावेळी शाभोयात्रेतल्या गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि चप्पलफेक झाली. त्यामुळे तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दोन गटांमधला राडा आणि लाठीचार्ज यात काहीजण जखमी झाल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे.

हे ही वाचा >> “उंटावरून शेळ्या हाकणारे”, राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरून सुषमा अंधारेंचा टोला, म्हणाल्या, “यांचे खरे चेहरे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री पोलीस ठाण्यात दाखल

दरम्यान, आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी करत भाजयुमो विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी येथील पोलिसांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. दरम्यान, मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं आश्वासन दिलं आहे.