मुंबई : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे (प्रिंट माध्यम), संदीप रामदासी (इलेक्ट्रॉनिक माध्यम) व शैलेश गायकवाड (समाज माध्यम) यांना प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल ‘साप्ताहिक विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल ‘मुंबई समाचार’चा, तर गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेलाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो. यानिमित्त प्रिंट, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यम, समाज माध्यम अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ जणांना शनिवारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल २०३ वर्षे जुन्या ‘मुंबई समाचार’चा, तसेच गेली ७७ वर्षे कार्यरत असलेल्या ‘हिंदुस्थान समाचार’ या बहुभाषिक वृत्तसंस्थेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
याव्यतिरिक्त, समाज माध्यम पुरस्कारांमध्ये यूट्यूबसाठी जय गगन, फेसबुकसाठी मृगा वर्तक आणि इन्स्टाग्रामसाठी सुनीता पावसकर व अमोल जामदारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सूरज चौगुले यांचाही सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा वांद्रे – कुर्ला संकुल येथे पार पडला. पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’चे कार्यकारी संचालक ‘अनंत गोयंका’, तर विशेष अतिथी म्हणून ‘टाइम्स नेटवर्क’च्या ग्रुप एडिटर व ‘टाइम्स नाऊ नवभारत’च्या मुख्य संपादक नाविका कुमार उपस्थित होत्या. तसेच राज्यसभेतील खासदार मिलिंद देवराही यावेळी उपस्थित होते.