मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकातून अहिंसेचे तत्वज्ञान आणि राष्ट्रहिताच्या विचारांमधील द्वंद्व मांडण्यात आले आहे. ‘शतजन्म शोधताना’, ‘मर्मबंधातली ठेव’ आदी विविध गाण्यांच्या माध्यमातून हे नाटक अजरामर झाले. आता हे नाटक नवीन स्वरूपात रंगभूमीवर दाखल होणार आहे, अशी माहिती नाटकाचे निर्माते रवींद्र साठे आणि सहनिर्माते अनंत पणशीकर यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक नव्या संचात, नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असून सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्यसंपदा कलामंच यांनी नाटकाच्या निर्मितीची धुरा उचलली आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवार, ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक १९३१ साली मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी रंगमंचावर आणले होते. आता हे नाटक नवीन स्वरूपात रंगभूमीवर आणताना रंगावृत्ती व दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तसेच, नेपथ्य संदेश बेंद्रे, पार्श्वसंगीत कौशल इनामदार, प्रकाशयोजना अमोघ फडके, नृत्य सोनिया परचुरे, वेशभूषा मयुरा रानडे, रंगभूषा श्रीकांत देसाई आणि सूत्रधार दीपक गोडबोले आहेत. तर हृषिकेश जोशी यांच्यासह मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आदी कलाकार नाटकात महत्वाच्या भूमिकेत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ८ जुलै १९१० रोजी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून उडी मारली होती. या दिवसाचे औचित्य साधून ८ जुलै २०२५ रोजी शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाचे १०० प्रयोग करण्याचा मानस असल्याचे सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी सांगितले. ‘आजच्या काळाची गरज ओळखून म्हणजेच कालसुसंगत बदल ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकात करण्यात आले आहेत. मूळ नाटक हे जवळपास पाच तासांचे होते, मात्र नाट्यगृहाची वेळ आणि इतर गोष्टींच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण पद्धतीने आवश्यक त्याच गोष्टी घेऊन अडीच तासांचे करण्यात आले आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तत्त्वज्ञान प्रकर्षाने मांडण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे’ असे दिग्दर्शक ह्रषिकेश जोशी यांनी सांगितले. या नाटकातील कलाकार हे मुंबई, पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकलेले प्रशिक्षित नट आहेत. हे सर्व कलाकार गेल्या दोन महिन्यांपासून मेहनतीने तालमी करीत आहेत. हे नाटक करताना कलाकारांपासून नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, नृत्य दिग्दर्शक, वेशभूषाकार, रंगभूषाकार सर्वांचाच कस लागलेला आहे,’ असेही हृषिकेश जोशी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांच्या विचार करून तिकिट दर कमी

‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या माध्यमातून आजच्या पिढीला संगीत नाटकाचे स्वरूप समजेल. सर्वांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पोहोचतील. हेच जाणून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे नाटक पाहता यावे, म्हणून तिकिटांचे दर ३००, २०० आणि १०० ठेवण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नाट्यगृहात एखादी रांग राखीव ठेवण्याचा विचार आहे, अशी माहिती रवींद्र साठे आणि अनंत पणशीकर यांनी दिली.