वेतनविषयक मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बहिष्काराचा पहिला फटका १ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘तृतीय वर्ष विज्ञान शाखे’च्या (बीएससी) प्रात्यक्षिक परीक्षांना बसणार आहे. प्राध्यापकांअभावी प्रात्यक्षिक परीक्षा घेणेच शक्य नाही. त्यामुळे लेखी परीक्षा संपल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विद्यापीठाला विचार करावा लागणार आहे.
सेट-नेटबाधित प्राध्यापकांच्या मान्यतेबरोबरच आपल्या विविध वेतनविषयक मागण्यांसाठी ‘बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स युनियन’ (बुक्टू) या प्राध्यापकांच्या संघटनेने परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील तब्बल चार हजाराहून अधिक प्राध्यापक बुक्टूच्या नेतृत्त्वाखाली बहिष्कारात सहभागी आहेत. गेल्या वर्षीही बुक्टूने या मागण्यांसाठी आंदोलन करून विद्यापीठाला आपल्या ताकदीचा हिसका दाखविला होता. परंतु, गेल्या वर्षी परीक्षा संपल्यानंतर प्राध्यापकांचे आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे, त्यांचा बहिष्कार उत्तरपत्रिका तपासणीपुरता मर्यादीत होता. त्या वेळेस विद्यापीठाने परीक्षकांसाठीचे पात्रता निकष कमी करून, निवृत्त प्राध्यापकांना कामाला लावून हे काम कसेतरी उरकले होते. परंतु, आता परीक्षा सुरू होण्याच्या आधीच बहिष्काराचे आंदोलन सुरू झाल्याने सर्व सरकारी व अनुदानित महाविद्यालयातील कला, विज्ञान, वाणिज्य शाखा विषयांच्या परीक्षा घेणे विद्यापीठासाठी अवघड होऊन बसणार आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू आदी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत २५ फेब्रुवारीला तातडीची बैठक घेणार आहेत. प्राध्यापकांचा बहिष्कार कायम राहिल्यास परीक्षेसंदर्भातील संभाव्य ‘स्ट्रॅटेजी’वर या बैठकीत चर्चा होईल. परीक्षेच्या कामासाठी प्राध्यापक उपलब्ध न झाल्यास प्रात्यक्षिक परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याच्या पर्यायावरही या बैठकीत विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर गरज वाटल्यास परीक्षा मंडळाची तातडीची बैठक बोलविली जाईल. कारण, परीक्षेसंदर्भातील नियमांमध्ये बदल करायचे झाल्यास त्यासाठी मंडळाची मान्यता घ्यावी लागते.
दरम्यानच्या काळात शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले तर ठीकच आहे. पण, बहिष्कार कायम राहिल्यास मार्च (पहिली परीक्षा बीकॉमची २८ मार्चपासून) महिन्यापासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षा घेणे देखील विद्यापीठाला शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. या संबंधात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. दीपक वसावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परिस्थिती ‘समाधानकारक’ असल्याची प्रतिक्रिया दिली. प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
गेल्या वर्षीचेच प्रश्नसंच?
सध्या विद्यापीठाकडे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठीही पुरेसे प्राध्यापक येत नाही आहेत. त्यामुळे, गेल्या वर्षीच्या परीक्षांसाठी तयार केलेल्या प्रश्नसंचापैकी न वापरलेले प्रश्नसंच परीक्षांसाठी वापरता येतील का असाही विचार सुरू आहे. अर्थात या सर्व पर्यायांना परीक्षा मंडळाची मान्यता आवश्यक राहील, असे परीक्षा मंडळातील सूत्रांनी सांगितले.
परीक्षांची संख्या आणि अंदाजे विद्यार्थी
शाखा      एकूण परीक्षा    विद्यार्थी (अंदाजे)
कला         १०७           दीड लाख
विज्ञान          ४३            २२ हजार
वाणिज्य         ७६            एक लाख