मुंबई : राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत (टप्पा दोन) सुमारे १६ हजार मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल. या हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेतील ५८५ कर्मचारी अद्यापही निवडणूक कामात व्यस्त

मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेंतर्गत उंबर्डा (जि. वाशिम) आणि नारंगवाडी (जि. धाराशिव) येथील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> राजकीय फलकबाजीला प्रतिबंध करा; आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषीपंपांना वीजपुरवठा करणारे सर्व फीडर टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनीवर येतील व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, असे फडणवीस यांनी नमूद केले. या कार्यक्रमात उंबर्डा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उंबर्डा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची क्षमता ४ मेगावॅट असून त्यातून १७११ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. नारंगवाडी येथील प्रकल्प २ मेगावॅट क्षमतेचा असून ८४५ शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. वाशिम व धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी एक प्रकल्प आधीच सुरू झाला आहे. या योजनेअंतर्गत राज्यात नोव्हेंबरअखेर १५,७०८ मेगावॅट क्षमतेचे सौर वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी ६६९ मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातून १,३०,४८६ शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.