राष्ट्रवादीच्या वतीने लढविण्यात येणाऱ्या २२ मतदारसंघांमधील पक्षाच्या नेत्यांची मते अजमविण्यासाठी शरद पवार यांनी दोन दिवसांचे आढावा सत्र सुरू केले आह़े मात्र बहुतांशी उमेदवारांची नावे ठरलेली असताना नेत्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही फक्त औपचारिकता असल्याचे राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांचे मत झाले आह़े.
मराठवाडा, विदर्भातील मतदारसंघांचा आढावा पहिल्या दिवशी घेण्यात आला. प्रत्येक मतदारसंघातील निवडक पुढाऱ्यांना आमंत्रित करून कोण उमेदवार असावा याबाबत मते पवार यांनी आजमावून घेतली. सोमवारी पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार आहे. उस्मानाबादमध्ये विद्यमान खासदार डॉ. पद्ममसिंह पाटील यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. पवनराजे निंबाळकर हत्येत डॉ. पाटील आरोपी असले तरी त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. दक्षिण नगरमध्ये राजीव राजाळे किंवा बबनराव पाचपुते यांचा मुलगा हे पर्याय पुढे आले. परभणीमध्ये विजय भांबळे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी आहे. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर किंवा सुरेश धस यापैकी एकाला रिंगणात उतविले जाईल़ मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात मराठा समाजातील सुरेश धस यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
मंत्र्यांचे लाड पुरे -अजित
खासदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठी निवडून येणारा हा घटक लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. मग पक्षाच्या काही मंत्र्यांनाही उभे करावे लागेल. काही मंत्र्यांचा म्हणे निवडणूक लढविण्यास विरोध आहे. पुरे झाले आता मंत्र्यांचे लाड, अशा शब्दांत अजित पवार यांनी मंत्र्यांना फटकारले. अजितदादांचा रोख कोणावर होता याचीच मग कुजबूज सुरू झाली.
‘आदर्श’त मंत्र्यांवर अन्याय
‘आदर्श’ चौकशी अहवालात सुनील तटकरे आणि राजेश टोपे या पक्षाच्या दोन मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आला असला तरी त्यांच्यावर हा अन्याय असल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली. अधिकार नसताना केवळ बैठक घेतली म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे. मुळातच राज्यमंत्र्यांना फारसे अधिकार नसतात. आमच्या पक्षाचे मंत्री वाचतील याची आम्ही खबरदारी घेतली, असेही पवार म्हणाले.
‘आप’ची काळजी नको
सध्या बदलांचे वारे आहेत. दिल्लीत ‘आप’चे सरकार सत्तेत आल्याने वेगळी चर्चा सुरू झाली. पण महाराष्ट्रातील एकूणच राजकीय परिस्थिती तसेच विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या पालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लक्षात घेता राज्यात अन्य पक्षांना थारा मिळणे कठीण असल्याचे पवार म्हणाले. देशात असे ‘आप’घात होत असतात त्याची काळजी बागळू नये, असेही पवार यांनी सांगितले.
सोशल मिडियाकडे लक्ष द्या
अलीकडे निवडणुकांमध्ये सोशल मिडियाचा वापर वाढला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हे प्रभावी साधन झाले आहे. याचा नेते आणि कार्यकर्त्यांनी वापर करावा व या माध्यमाचा उपयोग करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहचावे, असे आवाहन पवार यांनी केले. इलेट्रॉनिक्स माध्यमांचा प्रभावही वाढला आहे. हे माध्यम ज्याला उचलून धरते त्याचा बोलबाला जास्त झालेला पाहायला मिळतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
उमेदवारीत युवती काँग्रेसला झुकते माप देणार
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना नवे चेहरे दिले जातील व तेव्हा युवती काँग्रेसचाही विचार करावा लागेल, असे विधान शरद पवार यांनी केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उसलसुलट चर्चा सुरू झाली.  लोकसभेच्या वेळी नवे चेहरे देणे शक्य होणार नाही. पण विधानसभेच्या वेळी नक्कीच नवे चेहरे द्यावे लागतील, हे सांगताना पवार यांनी युवती काँग्रेसचा उल्लेख केला. पवार यांनी मुद्दामहूनच युवती काँग्रेसचा उल्लेख केला असणार, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.