भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप झाले, परस्परांनी उभयतांची कितीही उणीदुणी काढली वा विशेष भाषेचा वापर झाला तरीही गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे शिवसेना सत्ता सोडणार नाही, असा जिव्हारी चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी काढला. शिवसेनेने पाठिंबा काढलाच तरी गेल्या वर्षभरातील एकूणच भाजप सरकारचा कारभार बघता राष्ट्रवादी या सरकारला पाठिंबा देणार नाही, अशी गुगलीही त्यांनी टाकली.
भाजपने सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला देणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, या सरकारमध्ये शिवसेना
नंतर सहभागी झाली. आधी विरोधी पक्षनेतेपद मिळविले. नंतर काही तरी झाले आणि सत्तेत गेले. भाजप सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली आहे. त्याच सरकारमधून भाजपने बाहेर पडावे हे सांगण्याचे कोणते तर्क आहे हे समजत नाही, असे मत पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडले. शिवसेनेने कितीही इशारे दिले वा भाजपने किती कुरघोडी केली तरीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता दिसत नाही. भाजपकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, असे आधी वाटले होते, पण शिवसेनेचा पूर्वीसारखा स्वाभिमानी बाणा लयाला गेलेला दिसतो, असा चिमटा काढला. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून कितीही करण्यात आला तरी सहजासहजी सेना खुच्र्या सोडेल, असे वाटत नाही, असेही पवार म्हणाले.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला. त्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किल्ला लढविला. पण हेच राऊत त्यांच्याच भाषेतील ‘पाकडय़ां’चा (पाकिस्तानचा दौरा करून) पाहुणचार घेऊन आले आहेत याची आठवण पवार यांनी करून दिली.

केंद्र व राज्यात चिंताजनक परिस्थिती
देशातील एकूण परिस्थितीच्या निषेधार्थ साहित्यिक आणि लेखक पुरस्कार परत करीत आहेत ही बाब चिंताजनक असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले. धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून देशभर प्रतिक्रिया उमटूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मौन सोडण्यास विलंब लागला ही खेदजनक आहे. बहुधा दिल्ली आणि नागपूरमध्ये संपर्क होण्यास वेळ लागत असल्याने असा विलंब होत असावा, असा टोमणाही त्यांनी हाणला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरचा ठराव विधिमंडळात झाल्यावर दंगली पेटल्या असता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्याला दिल्लीत पाचारण केले होते. पण मोदी सरकारच्या काळात अशी काही खबरदारी घेतली जात नाही, असेही त्यांनी सांगितले. साहित्य वर्तुळात सरकारच्या विरोधात नाराजीचा सूर उमटल्यावर केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अशोभनीय होती. तसेच मोदी सरकारकडून या नाराजीची दखलही घेतली जात नाही याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली.