मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने वळणाच्या ठिकाणी दुर्घटनेच्या दोन दिवसांपूर्वी नवीन वेगमर्यादा लागू केली होती. मात्र हवेचा दाब, लोकलचा वेग, प्रवाशांचा गेलेला तोल या काही सेकंदाच्या घटनाक्रमाने मुंब्रा दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल एका आठवड्याभरात सादर केला जाणार आहे.
मुंब्रा दुर्घटना ही ९ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. प्राथमिक तपासादरम्यान ही घटना काही सेकंदात घडल्याचे समोर आले आहे. तपास करत असताना सुरुवातीला सीसीटीव्ही चित्रण पाहण्यात आले.
तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेवेळी दोन्ही लोकलच्या दारात उभे असलेल्या प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटर अंतर होते. सीएसएमटीहून कर्जतला जाणाऱ्या लोकलमधून एका प्रवाशाने हात काढला होता. त्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. त्याच्याबरोबर आणखी एक प्रवासीही होता. पहिल्या प्रवाशाकडे काळ्या रंगाची बॅग होती, त्या बॅगचे काही तुकडे लोकलला असल्याचे दिसून आले.
दरम्यान, मुंब्रा दुर्घटनेबाबत अद्याप अंतिम अहवाल आलेला नाही, असे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले.
वारा, वेगाचा परिणाम? अभियांत्रिकी विभागाला मुंब्रा येथील वळणाच्या ठिकाणी दुर्घटनेची भीती होती. त्यामुळे त्यांनी लोकल ताशी ७५ किमी वेगाने चालविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. या निर्णयाची अंमलबजावणीही झाली होती. परंतु वारा आणि वेगामुळे दोन्ही प्रवासी पडले असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत घटनाक्रम एकत्र करून, त्याचा निष्कर्ष काढून, एका आठवड्यात अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.