शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये सर्व विरोधक एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी दिल्लीत आपला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचंही अभिनंदन केलं. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “दिल्ली महानगरपालिकेत मिळालेल्या यशासाठी मी आपचं अभिनंदन करतो. हिमाचल प्रदेश लहान राज्य असलं तरी तेथे काँग्रेस ज्या पद्धतीने लढते आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे लागेल. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असंच लोकांना वाटतंय. देशाच्या पुढील निवडणुकींसाठी हे आशादायक चित्र आहे.”

“…तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही”

“फक्त विरोधकांनी एकत्र येणं आणि मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपआपसातील मतभेद, हेवेदावे, अहंकार दूर ठेऊन एकत्र लढाई केली तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे हे निकाल आहेत. सगळे एकत्र येऊन लढले तर गुजरातमध्येदेखील लोकसभा निवडणुकीतही परिवर्तन होईल,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“”राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये”

संजय राऊत पुढे म्हणाले, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. या निवडणुकांचा संदर्भ त्यांच्या यात्रेशी जोडणं चुकीचं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून राहुल गांधी दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत.”

हेही वाचा : Gujarat Election Results 2022 Live : भाजपा ऐतिहासिक विजयाच्या दिशेने, १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता; वाचा प्रत्येक अपडेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या निकालाचा संबंध जबाबदाऱ्या असलेल्या काँग्रेस अध्यक्षांशी जोडावा”

“राहुल गांधी देश जोडणं, देशातील द्वेष नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत. त्या यात्रेला चांगलं यश मिळत आहे. त्यामुळे त्या यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडणं मला पटत नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर लोकांना जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्याशी या निकालाचा संबंध जोडला जाऊ शकतो,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.