पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत राजकारण रंगल्याची चर्चा आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही असं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास व्यक्त केला असून सरकारमध्ये कोणतेही मतभेद, कुरबुरी, अंतर्विरोध नसल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की, "पारनेरच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक पातळीवरचा विषय होता, तो तिथेच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं". आणखी वाचा- काही लोक महाविकास आघाडीत वाद होण्याची वाट बघत आहेत - बाळासाहेब थोरात पारनेर नगरपंचायतीमधील पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ४ जुलै रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बारामतीत हा कार्यक्रम पार पडला. यामुळे स्थानिक राजकारणात खळबल उडाली असून शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीदेखील यावर भाष्य करताना महाविकास आघाडीत सर्व निर्णय हे वरच्या पातळीवर होतात. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय कुठला निर्णय होत नाही असं सांगितलं आहे. रोहित पवार यांनी सांगितलं की, "राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नगरसेवक अंतर्गत राजकारणाला कंटाळून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत होते. याचा दुष्परिणाम महाविकास आघाडीवर होऊ नये, यासाठी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला," असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. आणखी वाचा- अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत, राऊतांचं फडणवीसांना उत्तर फडणवीसांवर टीका "देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की, महाविकास आघाडीमध्ये अंतर्विरोध आहे. पण अंतर्विरोध काय, तर आंतरपाटही नाहीये. आम्ही वरमाला घातल्या आहेत, आमच्यात कोणताही आंतरपाट नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे देशातील तीन प्रमुख पक्षांनी बनवलेलं आहे. ही खिचडी नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. काल शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यांनीही ठाम विश्वास व्यक्त केला आहे की, हे सरकार पाच वर्ष काम करेल," असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आणखी वाचा- शरद पवारांच्या मुलाखतीबद्दल संजय राऊत म्हणतात… “ही मुलाखत ऐतिहासिक ठरेल” शरद पवारांची मुलाखत "शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं अगोदरच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरपेक्षा अधिक मुलाखत घेतल्या आहेत. पहिल्यांदाच सामनासाठी घेतलेली ही पहिलीच मुलाखत आहे. लोकांना पाहिलेले पवार वेगळे आहेत, मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज, बदनामीकारक विधान कायम केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटल होतं की, शरद पवार सरकार बनवतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं," असं राऊत यांनी म्हटलं.