विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. पण, एकही दिवस सभागृहात न चुकता उपस्थित राहणाऱ्या शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेनशात बोलून दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. आज ( २१ मार्च ) भास्कर जाधव यांनी विधिमंडळात न जाता बाहेरूनच पायऱ्यांवर नतमस्तक होत, सभागृहात येण्याची इच्छा नाही, अशी खंत व्यक्त केली.

विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “आज सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा असल्याने घरी निघालो आहे. पुढील तीन दिवस सभागृह चालणार आहे, पण माघारी सभागृहात येणार नाही. कारण, सभागृहात येण्याची इच्छा राहिली नाही.”

हेही वाचा : “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून…”, आशिष शेलारांचा टोला

“मनात अत्यंत वेदना होत आहेत. एकही दिवस सभागृहाचे कामकाज चुकवत नाही. मात्र, मला जाणीवपूर्वक बोल दिलं जात नाही. विषय मांडून दिलं जात नाही. सभागृहात लक्षवेधी मांडण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. माझ्या दोन लक्षवेधी लागण्यासाठी प्रयत्न केला. पण, एकही लक्षवेधी लागू शकली नाही. त्यामुळे मनात अनंत यातना आहेत,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

हेही वाचा : “…असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय आहे प्रकरण?

“विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सातत्याने अवकाळी पावसाला सामोरं जावं लागतं. कधी-कधी त्यांच्या पिकांना भावच मिळत नाही. गारपिटीने त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. ही घटना अत्यंत वेदनादायक आणि क्लेशदायक आहे. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. तसेच, आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये,” अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.