मुंबई :  शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने ठाण्यात संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ६ थरांचा मानवी मनोरा रचत सलामी दिली. मुंबई व ठाणे परिसरात दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी उत्सवप्रेमींची गर्दी उसळली आहे. मात्र दरवर्षी कोकणात सहा थरांचा मानवी मनोरा रचणारे राजापूरमधील शिवशक्ती महिला गोविंदा पथक यंदा मुंबई व ठाण्यात सात थर रचून नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील शिवशक्ती महिला गोविंदा पथकाचे यंदा १९ वे वर्ष आहे. या गोविंदा पथकातील मुली मुळच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावात राहणाऱ्या आहेत. मात्र काही मुली या कामानिमित्त मुंबईत असतात. त्यामुळे सर्वांना सोयीस्कर व्हावे यासाठी मुंबईत एकत्र जमून मानवी मनोरे रचण्याचा सराव करण्यात येतो आणि त्यानंतर या मुली कोकणात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रवाना होतात. मात्र यंदा शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने मुंबई व ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वप्ननगरी मुंबईत आपले कौशल्य दाखविण्यासाठी हे महिला गोविंदा पथक सज्ज झाले आहे. तसेच यंदा सहा थराऐवजी सात थर रचण्याची तयारीही या मुलींनी केली आहे. गेले काही दिवस रात्रीचा जागर करीत या पथकातील महिला गोविंदा डोंबिवलीमध्ये सराव करीत होत्या.

हेही वाचा >>>सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शिवशक्ती महिला गोविंदा पथक हे कोकणातील एकमेव महिला गोविंदा पथक आहे. मुंबई व ठाण्यात मोठ्या स्तरावर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो, त्यामुळे या दहीहंडी उत्सवात कोकणातील मुलींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी यंदा मुंबई व ठाण्यातील दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गोविंदा पथकातील मुली या वर्षभर स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात, तसेच दहीहंडी उत्सव जवळ येताच दररोज दोन तास कसून सरावही करतात. यंदा मुंबई व ठाण्यातील दहीहंडी उत्सवात कोकणचे नाव गाजविण्यासाठी सज्ज आहोत’, असे शिवशक्ती महिला गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक गुरव यांनी सांगितले.