ज्येष्ठ ख्याल गायनाचार्य मिराशीबुवा यांनी हस्तलिखित स्वरूपात जतन केलेल्या बंदिशांचा अनमोल ठेवा आता लवकरच पुस्तकाच्या रूपाने संगीतप्रेमी आणि रसिकांसमोर येणार आहे. या ग्रंथात मिराशीबुवांच्या हस्ताक्षरातील तब्बल सातशेहून अधिक रचनांचा समावेश असणार आहे.
ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गाणारे गायनाचार्य मिराशीबुवा हे त्यांच्या वेगवान तानांसाठी प्रसिद्ध होते. त्यांना त्यांच्या वडिलांकडून आणि पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडून बंदिशींचा खजिना मिळाला. तो त्यांनी हस्तलिखित स्वरूपात जतन केला. हा अनमोल खजिना मिराशीबुवांचे ८६ वर्षीय चिरंजीव विष्णुबुवा यांनी ‘संस्कार प्रकाशन’ या संस्थेचे प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केला. तो आता पुस्तक स्वरूपात प्रकाशित होणार आहे. ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ या विषयावरील पुस्तकांचेप्रकाशन ‘संस्कार प्रकाशनाकडून केले जाते. प्रकाशक प्रसाद कुलकर्णी हे रासायनिक अभियंता आहेत. शास्त्रीय संगीताचा कोणताही अभ्यास नसताना केवळ अभिजात संगीताच्या सेवेसाठी ‘संस्कार प्रकाशन’ काम करत आहे. संगणकावरील लेखनासाठी संगीत फाँट्सची निर्मिती करण्याच्या प्रकल्पावरही सध्या त्यांचे काम सुरू आहे. भारतीय स्वरलिपीचा इतिहास, पाश्चात्त्य स्वरलिपी, राग वर्गीकरण, वैदिक संगीत, संगीत घराणी, नाटय़संगीत, लोकसंगीत, भावसंगीत, जागतिक संगीत, आवाजाची साधना, कठंसाधना, भारतीय संगीताचा इतिहास, भारतीय वाद्यांची परंपरा, ‘राग’ संकल्पनेवर विस्तृत विवेचन, ख्याल प्रकाराची विविध अंगे, बंदिशी व राग यांचा संबंध, संगीत शब्दकोश, रियाज, श्रुती आदी विषयांवरील पुस्तके ‘संस्कार प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. ज्येष्ठ गायक पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित कुमार गंधर्व यांच्यावरील पुस्तकेही लवकरच प्रकाशित केली जाणार आहेत.
भाारतीय अभिजात संगीताचा आपल्याकडे जो खजिना आहे. असा खजिना जगात शोधून सापडणार नाही. मात्र असे असूनही आपल्याकडे याकडे गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. माझ्या हातून भारतीय अभिजात संगीताची सेवा होत आहे तिचा आनंद खूप मोठा आहे. केवळ पुस्तके प्रकाशन करून त्यातून पसे मिळवणे हा एकमेव उद्देश ‘संस्कार प्रकाशन’चा नाही. आत्मिक शांतीचा संदेश देणाऱ्या आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताच्या परंपरेच्या या अमूल्य ठेव्याचे जतन आणि संवर्धन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
– प्रसाद कुलकर्णी, संस्कार प्रकाशन