मुंबई : बांगला देशातून मानवी तस्करी करणाऱ्या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला असून पोलिसांनी मुंबई आणि पुण्यात छापे टाकून दलाल आणि सहा महिलांना अटक केली. हे सातही जण बांगला देशातील नागरिक आहेत. वेगवेगळ्या कामासाठी त्यांना भारतात पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांच्याकडे भारतातील वास्तव्यासाठी लागणारे बनावट आधारकार्ड सापडले आहे.
बांगला देशातून मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होते. बांगला देशातील महिला आणि पुरूषांना भारतात कामासाठी बेकायदेशीररित्या पाठविण्यात येते. मानवी तस्करीसाठी मोठी टोळी कार्यरत आहे. अशाच एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. महिलांची तस्करी करणारा एका दलाल अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीसी) मिळाली होती. अंधेरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधीत पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप यांनी सापळा रचून आरोपी बायजीत अयूब शेखला ताब्यात घेतले. तो बांगला देशी नागरिक असून भारतात बेकादेशीररित्या वास्तव्य करीत होता. त्याची चौकशी केली असता तो बांगला देशातून महिलांना भारतात पाठवत असल्याचे उघडकीस आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंधेरीतील जेव्हीएलआर लिंक रोड येथून दोन बांगला देशी महिलांना अटक केली. त्याने चार महिलांना पुण्यातील कात्रज येथे पाठवले होते. पोलीस पथकाने पुण्यात छापे टाकून आणखी चार महिलांना ताब्यात घेऊन अटक केली. गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी बायजीत शेख मानवी तस्करी करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पुरूष दलालासह सहा बांगला देशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांना भारतीय ओळख मिळवून देण्यासाठी बनावट आधारकार्ड दिले जात होते. या टोळीतील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. परिमंडळ ११ ने नुकतेच कारवाई करून ११ बांगला देशी महिलांना अटक केली होती. बांगला देशातून मानवी तस्करी करणाऱ्या टोळीची व्याप्ती मोठी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. बांधकाम मजूरापासून देहविक्रीच्या व्यवसायात बांगला देशी महिलांचा सहभाग असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे, पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप, महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री ढेंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.