मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी कामगार संघटनांच्या बैठकीत सांगितले. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी परिवहन मंत्री म्हणाले, कामगारांचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व अन्य थकीत भत्ते; तसेच दिवाळी सण उचल देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. २०१८ पासून कर्मचाऱ्यांची उपरोक्त स्वरुपाची आर्थिक देणी प्रलंबित आहेत. त्यासाठी सुमारे ४,४०० कोटी रुपये लागणार आहेत. प्रत्येक वेळेस शासनाकडे निधी मागणे योग्य नाही. त्याकरता एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. म्हणून मी कार्यभार स्वीकारल्यापासून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये, आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून वर्षाला १०० कोटी; तसेच महामंडळाच्या बस आगारात असलेले पेट्रोल पंप सध्या केवळ महामंडळाच्या बसकरीता इंधन पुरवठा करतात. भविष्यात हे पेट्रोल पंप व्यावसायिक स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. याद्वारे वर्षाला २०० ते २५० कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे वर्षाला ५०० ते ६०० कोटी रुपयांची उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. त्याबरोबरच उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळाचे स्वतचे प्रवासी अॅप विकसित करण्यात येत आहे. या मधूनही अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा व इ-बाइक सेवा पुरविणात येणार आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे. त्यात कामगारांसाठी सदनिका व विश्रामगृह बांधण्याचेही प्रायोजन आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. सार्वजनिक-खासगी भागिदारीतून होणाऱ्या प्रकल्प विकासातून महामंडळाची स्थावर मालमत्ता विकसित होईल. त्याचबरोबर वर्षाला एक ते दीड हजार कोटी रुपये उत्पन्न देखील मिळणे अपेक्षित आहे.

करार पद्धतीची भरती प्रक्रिया ही तात्पुरती मलमपट्टी

पुढील वर्षाअखेरीपर्यंत ८ हजार नवीन बस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. महामंडळाकडील एकूण बसची संख्या १८ ते २० हजार करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी शासनाकडे मागितले आहे. तथापि, ती मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात करार पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार आहे. ही व्यवस्था वाढीव बसमधून प्रवाशांना सेवा देण्यासाठी करण्यात येईल. त्यातून निश्चितच उत्पन्न वाढणार आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

आंदोलनावर ठाम

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागण्या मांडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सोमवारी सांगितले होते. त्यानुसार, मंगळवारी सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, प्रलंबित आर्थिक मागण्यांसह इतर मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने घेतली आहे.