अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्यावतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा काढला आहे. या महामोर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

“मोर्चाचा इशारा म्हणजे ते सरकारविरोधातच असतात. हे असंवेदनशील ईडी सरकार आहे. कुणी ऐकूनच घेत नाही म्हणून लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. मी लिंगायत समाजाचे प्रश्न संसदेत वेळोवेळी मांडत आली आहे. लिंगायत समजाचे प्रश्न हे समजून घेणं आणि त्यावर मार्ग काढणं ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.” असं सुप्रिया सुळे यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा – शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? निवडणूक आयोगापुढे उद्या होणाऱ्या सुनावणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

लिंगायतला धर्माला संविधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने धार्मिक अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा, विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारावा आदी मागण्या लिंगायत समाज बांधवांकडून करण्यात येत आहेत. मोठ्या संख्यने या महामोर्चात लिंगायत समाजबांधव जमा झालेले आहेत. लेखी आश्वासनाशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.

या महामोर्चासाठी सकाळपासून लिंगायत समजाचे बांधव आझाद मैदानावर मोठ्यासंख्येने जमा झाले आहेत. मागील आठवड्यातच लिंगायत समाजाच्या प्रतिनिधींनी या मागण्यांसदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी या मागण्यांबाबत त्यांना सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आली होती. मात्र ठोस आश्वासन मिळालं नव्हतं. त्यामुळे आता लिंगायत समाजाला लेखी आश्वासन हवं आहे किंवा आझाद मैदानावर सरकारकडून शिष्टमंडळ यावं आणि त्यांनी चर्चा करावी अशी समाजबांधवांची मागणी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आझाद मैदान ते सीएसटी अशी मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र केवळ आझाद मैदानावरच मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.