मुंबई : Kanjurmarg Carshed Metro 6 स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ च्या कांजूरमार्ग येथील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी घेतला. लवकरच या कारशेडच्या बांधकामासाठी निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

मेट्रो ६ साठी २०१६ मध्ये कांजूरमार्ग येथे कारशेड बांधण्याचा प्रस्तावर होता. २०१७ मध्ये सरकारने त्यास मान्यता दिली. मात्र, २०२० मध्ये ही जागा वादात अडकली. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) चे कारशेड आरेतून या जागेवर हलविल्यानंतर केंद्र सरकारने या जागेवर मालकी हक्क असल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आतापर्यंत हा वाद सुरू होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो ३ साठी कारशेड पुन्हा आरेमध्ये नेल्यानंतर जागेचा वाद संपुष्टात आला. तर, आता सरकारने कांजूरमार्गची १५ हेक्टर जागा मेट्रो ६ साठी एमएमआरडीएला दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सरकारच्या आदेशानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जागेच्या हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण करत ‘एमएमआरडीए’कडून हमीपत्र घेत सोमवारी जागा ताब्यात घेण्याचे लेखी आदेश ‘एमएमआरडीए’ला दिले होते. त्यानुसार बुधवारी  जागेचा ताबा घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. आता लवकर कारशेडच्या कामाला सुरुवात करण्याचे ‘एमएमआरडीए’चे प्रयत्न आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांतच कारशेडच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले.