मुंबई : राज्यात थंडीची लाट आली असून अनेक भागातील किमान तापमान हे आठ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. मुंबई किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. येत्या दोन दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमानामध्ये खूप फरक असल्याने संमिश्र तापमानाला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर येथे होत असलेल्या बर्फवृष्टीनंतर उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड लहरींमुळे राज्यात गारवा वाढला आहे. मुंबई उपनगरांत रविवारी रात्रीपासून पारा घसरू लागला आहे. मुंबईत सोमवारी सकाळी सांताक्रूझ केंद्राने किमान तापमान १७ अंश सेल्सिअस आणि कुलाबा केंद्राने किमान २०.९ अंश सेल्सिअस नोंदवले. दरम्यान, कोकणातील किमान तापमान साधारण २ ते ३ आणि उर्वरित राज्यात ४ अंश सेल्सिअस कमी होण्याची शक्यता आहे. येत्या दहा दिवस राज्यातील अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. दुपारचे म्हणजे कमाल तापमानही काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. हेही वाचा: ‘भाज्यपाल हटावो, महाराष्ट्र बचावो’, पुण्यात डमी राज्यपाल आणत राष्ट्रवादीचे आंदोलन पाऱ्याची घसरणजळगाव ८.२, पुणे ८.८, औरंगाबाद ८.९, नाशिक ९.२, परभणी ११, उदगीर ११.५, जालना ११.६, उस्मानाबाद १२, बारामती ९.७, नांदेड १२.२, सोलापूर १२.७, सातारा १३, कोल्हापूर १४.८, माथेरान १५, रत्नागिरी १७.२ अंश सेल्सिअस